प्रेस मीडिया लाईव्ह :
राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार असून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) शाळा ९ जून पासून सुरू होणार आहेत. तर राज्य मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा १६ जून पासून सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांच्या शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यात गुंतले आहेत.
राज्यातील विविध भागांतील हवामान व उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसईच्या शाळा बहुतेक शहरी भागात असतात आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होते. राज्य मंडळाच्या शाळा मुख्यतः ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्या थोड्या उशिराने सुरू होणार आहेत दरम्यान, अनेक शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम, उपक्रम व तांत्रिक सुविधा लागू करण्याचे काम देखील चालू आहे. काही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल अभ्यासक्रम, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.या वर्षीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.