आजपासून 8 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी लागू केला


प्रेस मीडिया लाईव्ह : 

गणेश राऊळ :

 सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात विविध धार्मिक सण साजरे होत असून सध्या विविध ठिकाणी सांप्रदायिक घटना घडत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामाजिक तसेच वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी आंदोलने, निदर्शने होत असून आगामी काळात जिल्ह्यामध्ये अचानकपणे उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.


जिल्ह्यात मनाई आदेश

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार आजपासून 8 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी लागू केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलम 37 (1) लागू असेल. त्या अनुषंगाने शस्त्रे, साटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, जिल्ह्यात पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे, वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post