मिरजेत पावसाने शहरासह विस्तारित भागातील रस्त्यांची दैना



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मिरजेत पावसाने शहरासह विस्तारित भागातील रस्त्यांची दैना उडाली आहे. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व चिखलातून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही पावसाने चार दिवसांत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मिरज वैद्यकीय नगरीचा खराब रस्ते व खड्डय़ांबाबत लौकिक होत आहे.

मिरजेतील छत्रपती शिवाजी रोड, वंटमुरे कॉर्नर ते स्टेशन चौक रोड, मालगाव रोड, टाकळी रोड या रस्त्यांवर पावसाने खड्डे पडले आहेत. शहरातील रस्तेही खराब झाले आहेत. 'अमृत जल योजने'साठी शहरातील रस्ते खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे व चिखल आहे. शास्त्राr चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीनंतर पुन्हा खड्डे पडत आहेत.खराब रस्त्यांमुळे प्रमुख चौकात वाहतूककोंडीची समस्या आहे.

शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी मार्गावर मुख्य बस स्थानक, शहरी बस स्थानक, तसेच लहान-मोठी रुग्णालये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. महापालिका स्थापनेनंतर 22 वर्षांत मिरजेतील रस्त्यांवर शेकडो कोटी रुपये खर्च झाल्याची महापालिकेची आकडेवारी आहे. मात्र, शहरातील रस्ते अद्यापि दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरातील प्रमुख मार्गांवर खड्डय़ांतून अवजड वाहने, ट्रक व ट्रक्टरची ये-जा होत असते. गांधी चौकासह अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून खड्डय़ांत पावसाचे पाणी साचले आहे. शहरातील 50 वर्षांपूर्वीचा रिंग रोड अरुंद असल्याने कर्नाटकात जाणारी वाहने शहरातून ये-जा करतात. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पावसाने मोठी दुरवस्था झाली आहे.तसेच शहरालगत विस्तारित भागात गुंठेवारी भागात कच्च्या रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे अवघड झाले आहे. शहरालगत विस्तारित भागात व उपनगरात कच्च्या रस्त्यांचे मुरुमीकरण रखडल्याने चिखलातून वाट काढणारे नागरिक महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post