मुंबई दि. 23 - महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यस्था खिळखिळी झाली आहे.पोलिसांचेही मनोबल खचत आहे. जनतेचा राज्य सरकारवर विश्वास उडाला आहे. राज्यातील या निराशाजनक स्थितीबाबत राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाचे शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.या शिष्टमंडळाचे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग यांनी केले. त्यात हेमंत रणपिसे; प्रवीण मोरे यांचा सहभाग होता.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठविले आहे. त्या भूमिकेला अनुसरून आज रिपाइं च्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.
महाराष्ट्रात आलेले निसर्ग वादळ; आता कोरोनाची वाढत असलेली महामारी या संकटात महाविकास आघाडी चे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करीत हे राज्य सरकार बरखास्त करावे अशी मागणी रिपाइंच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.