लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील.... आरोग्यमंत्री राजेश टोपे.



राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या बाबी पाळून रुग्णसंख्येला आळा घालू शकतो.त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

रुग्णशय्येची कमतरता नाही

राज्यात बाधित होणाऱया एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयांतील खाटांची कमतरता नाही.

दररोज सवा लाख नागरिकांना लस

राज्यात लसीकरणाला मोठय़ा प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सवा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post