पुणे: विशेष (9 ऑगस्ट क्रांती दिन)


विशेष (9 ऑगस्ट क्रांतिदिन) : स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पर्व

   PRESS MEDIA LIVE : पुणे :

9 ऑगस्ट 1942 रोजी “चले जाव’ या महात्मा गांधींच्या स्फूर्तिदायी घोषणेने लाखो लोक देशात रस्त्यावर उतरले. त्यातीलच पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पुणे शहरातील नारायण दाभाडे या शाळकरी मुलाने कॉंग्रेस भवन येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या बंदुकांना न घाबरता पुढे सरसावून तेथील युनियन जॅक खाली फेकून त्याने तेथे तिरंगा फडकावला. मात्र, वंदेमातरम्‌चा जयघोष करीत असतानाच पोलिसांनी केलेल्या अमानवी गोळीबारात बंदुकीच्या तीन गोळ्या लागून तेथे तो शहीद झाला. 9 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या नारायण दाभाडेंची स्मृती आज 78 वर्षांनंतरही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. 

आजच्या युवा पिढीला 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पूर्णपणे माहीत असणे गरजेचे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, तात्या टोपे यांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा उठाव, कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनचा स्वातंत्र्यलढा, लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, चापेकर बंधू अशा क्रांतिकारकांचे हौतात्म्य असे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे बनले होते. 9 ऑगस्ट 1942 चा “चले जाव’ आणि “करेंगे या मरेंगे’ हा महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर कॉंग्रेस अधिवेशनात दिलेला नारा म्हणजे स्वातंत्र्याचे विजयबिगुल ठरले.

महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना अबूल कलाम आझाद, रफी अहमद किडवाई, राजगोपालाचारी चक्रवर्ती अशा साऱ्या महत्त्वाच्या नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. मात्र, त्यामुळे आंदोलन शमले नाही तर उफाळून आले. 9 ऑगस्ट 1942च्या सकाळी गवालिया टॅंक मैदानावर लाखोंच्या गर्दीवर पोलिसांनी निष्ठुरपणे लाठीहल्ला केला. त्याला न डगमगता अरुणा असफअली या युवतीने “वंदेमातरम्‌’च्या घोषणा देत तिरंगा फडकवला आणि नवा इतिहास घडला. स्वातंत्र्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनतेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध जणू उठावच केला होता. साऱ्या देशभर पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिसेस यावर हल्ले झाले. टेलिफोनच्या तारा तोडल्या गेल्या, रेल्वेच्या फिशप्लेट्‌स काढून रेल्वे वाहतूक रोखली गेली. लाखोंनी तुरूंगवास भोगला. हजारो शहीद झाले. मात्र, स्वातंत्र्यासाठीचा हा वणवा पेटतच राहिला.

महाकवी ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतिवीर अण्णा भाऊ साठे अशांची क्रांतीची गीते खेडोपाडी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम क्रांतिवीर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर दत्ता गव्हाणकर यांनी करून मोठ्या प्रमाणावर जनमत संघटित केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी “प्रतीसरकार’ स्थापन केले. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, भाई वैद्य असे अनेक नेते पुण्यात भूमिगत झाले व भूमिगत राहूनच स्वातंत्र्याचा वणवा पेटवत राहिले.

पुण्यात कॅपिटल बॉम्ब खटला गाजत होता. सहकऱ्यांची नावे उघड करावी लागू नयेत यासाठी फरासखाना पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या पांडूरंग कर्णिक या ऍम्युनिशन फॅक्‍टरीतील युवक क्रांतिकारकाची आत्महत्या साऱ्यांचेच रक्‍त तापवून गेली. क्रांतिकारक पांडूरंग कर्णिक यांचे फरासखाना पोलीस ठाण्याबाहेरील स्मारक आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांनी दिलेले योगदान आणि बलिदान सदैव स्फूर्तिदायकच राहिले.

या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करून त्यांना वंदन करण्याचे अनेक कार्यक्रम कॉंग्रेस भवनमध्ये घडत राहिले. 9 ऑगस्ट 1942 च्या लढ्यानंतर देशभर पसरलेल्या आंदोलनामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी पराभूत केले. या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करताना देशातील सध्याची परिस्थिती व त्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

जात, धर्म, वंश, भाषा हे वाद दूर ठेवून स्वातंत्र्यलढा साकारला गेला. आता मात्र धार्मिकता व जातीयता वाढवून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्‍ती करताना दिसत आहेत. भाषा व प्रांत या मुद्द्यांवर लोकांची माथी भडकवली जात आहेत. लोकशाही, सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव या आदर्श मूल्यांना मागे ढकलले जात आहे. अशावेळी स्वातंत्र्यानंतर सुराज्य निर्माण करण्याची व त्यातून आपला देश अधिक बलवान करण्याची शपथ प्रत्येकाने घेऊन काम केले पाहिजे. “भारत माझा देश आहे – सारे भारतीय माझे बांधव आहेत… ही शाळेत शिकलेली प्रतिज्ञा प्रत्यक्षात आचरणात आणली पाहीजे. हीच देशासाठी त्याग केलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.


– रमेश बागवे

अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी

Post a Comment

Previous Post Next Post