पूण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. 'पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. हम करे सो कायदा असून हे बरोबर नाही. केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू', असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला.लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत', असं गिरीश बापट म्हणाले. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारनं बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिलं नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे', असं बापट यांनी सांगितलं. लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप बापट यांनी केला. यामुळं लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोकं ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाई करा. मात्र दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचं आहे. असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बापट यांनी दिला.
PRESS MEDIA : पुणे : मोहम्मद जावेद मौला.