प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२७ अलमट्टी म्हणजे अलमट्टी गावात असलेल्या लाल बहादूर शास्त्री धरणाच्या उंचीवाढीचा विषय हा केवळ राजकीय नफ्या तोट्याचा नाही तर लोकजीवनाच्या जिव्हाळ्याचा किंबहुना जीवन मरणाचा प्रश्न आहे . त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने नि :पक्षपाती, पारदर्शक निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. तसेच दोन्ही राज्यांनीही समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे.
या चर्चासत्रात देशभरात धरणाचे दरवाजे उघडल्याने अथवा बंद केल्यानेही वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा फटका बसत असतो. तज्ञांच्या समितीच्या सल्ल्याने अथवा न्यायालयाच्या निकालाने ज्या ठिकाणी धरणाच्या पाण्याचे प्रश्न सोडवले जातात तोपर्यंत ते सुरळीत असते. मात्र राज्याच्या पाणी मागणीतून निर्माण होणारे प्रश्न अधिक तीव्र होत जातात असेही दिसून येते. नैसर्गिक पाऊस पडून येणारा महापौर आणि धरणातून विसर्ग न केल्यामुळे येणारा महापूर याचे स्वरूप व त्यातून होणारे नुकसान याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच या किंवा अन्य कोणत्याही प्रश्नामुळे दोन राज्ये एकमेकांपुढे शत्रुत्व भावनेने उभी राहून चालणार नाही. कारण त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ शकतो. नदी संवर्धन आणि धरण काळजी हा अतिशय महत्त्वाचा विषय असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच अलमट्टीची उंची वाढवण्यासाठीचा परवानगी मागणी अर्ज, कोल्हापूर ,सांगली व सातारा या जिल्ह्याला अलीकडे वारंवार येणारा महापूर व त्याची कारणे, धरणाची उंची वाढल्याने निर्माण होणारे प्रश्न, नदी व धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासह पाणीसाठप क्षमता वाढवण्याचे उपाय, महाराष्ट्र कर्नाटक व केंद्र सरकारची भूमिका, हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठीची उपाययोजना शोधण्याची गरज आदी अनेक बाबींची सखोल चर्चा झाली.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ पत्रकार चिदानंद अलुरे यांना आदरांजली वाहण्यात आली .