१४ मार्च सुरेश भट स्मृतिदिन अर्थात मराठी गझल दिन

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)

“उष :काल होता होता काळ रात्र झाली

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “…

अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते कालवश झाले. सोमवार ता.१४ मार्च २०२२ रोजी त्यांचा  एकोणीसावा स्मृतिदिन आहे.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच.

‘जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा

घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची…

असे म्हणणारे सुरेश भट कविते मधल्या ‘गझल’ या काव्यप्रकारासाठी जन्मभर फुलत व झिजतही राहिले. स्वतः लिहीत असतानाच शेकडो कवींना त्यांनी लिहिते केले .आपल्यामागे लिहिती पिढी निर्माण करणारा ऐतिहासिक कवी एखादाच असतो. मराठी कवितेच्या इतिहासात सुरेश भट हा असा इतिहास पुरुष आहे. मराठी गझलेसाठी आपल्या शेकडो अप्रतिम गझला, बाराखडी , शेकडो शिष्यांच जाळ विणून त्यांनी मराठी गझलविधा कमालीची समृद्ध केली.म्हणूनच सुरेश भट यांचा स्मृतिदिन हा 'मराठी गझल दिन ' म्हणावा लागेल.

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा,

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…

असे अभिमानाने म्हणणारे सुरेश भट हे फक्त कवितेसाठी जगणारे, दिवसाचे चोवीस तास कवितेच्या कैफात धुंद राहणारे द्रष्टे महाकवी होते.

“पुसतात जात मुदडे मसणात एकमेकांना ,

कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला ?

असा विदारक ,दाहक अनुभव मांडणारे सुरेश भट मानवी मनोव्यापारांचे चित्रण अतिशय प्रभावी पद्धतीने करत असत. त्यांच्याइतके प्रखर सामाजिक भान असलेला कवी फार विरळा असतो. म्हणून तर त्यांच्या कवितांवर, गीतांवर गझलांवर तमाम महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले . त्यातूनच

मी साळसूद सुर्याशी केले न कधी तहनामे ,

मी लाख लाख लोकांच्या हृदयात प्रकाशत होतो “..

असा अदम्य विश्वास त्यांना प्राप्त झाला होता.सुरेश भटांनी माणसांवर नितांत प्रेम केले .’कोणत्याही जातीय दंगलीत पक्षी मारले जात नाहीत, झाडे कापली जात नाहीत ,मारली व कापली जातात ती माणसे ‘असे म्हणणाऱ्या सुरेश भटांना मानवतेची जपणूक करणारी कविता अतिशय जवळची वाटत असे.किंबहुना तीच कविता त्यांनी लिहिली.वयाच्या अठराव्या वर्षापासून म्हणजेच १९५० च्या आसपास सुरेश भटांनी कविता लिहायला सुरुवात केली.१९६३-६४ पासून त्यांनी गझल लेखनाला सुरुवात केली.

मराठीतील सर्व संत साहित्य,केशवसुत ,तांबे ,कुसुमाग्रज यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. उर्दू गझलेतील मिर्झा गालिब, इक्बाल, जिगर मुरादाबादी ,फैज अहमद फैज ,नासिम काजमी,कतील शिफाई, अहमद फराज हे त्यांचे आवडते शायर होते. सुरेश भट म्हणायचे की,या कवींकडून मी दोन गोष्टी शिकलो,’ एक म्हणजे कमीतकमी शब्दातून जास्तीत जास्त आशय उत्कटपणे प्रकट करणे. दुसरे म्हणजे एकही अनावश्यक शब्द न वापरणे.’शब्दांची इज्जत करणे व ते करीत असताना गझलेचा नखरा सांभाळणे त्यांना महत्त्वाचे वाटत असे. शब्दांसाठी मी नाही तर माझ्यासाठी शब्द आहेत ही त्यांची ठाम भूमिका होती.हे ध्यानात घेणे फार महत्वाचे आहे.

सुरेश भट यांना बालवयातच पोलिओ झाल्याने ते एका पायाने अपंग होते.आपल्या व्यंगावर मात करणाऱ्या भटांनी काही काळ शिक्षक,पत्रकार म्हणून काम केले.पण ते रमले फक्त आणि फक्त लेखनातच.भटांना संगीताची,वाद्यांची उत्तम जाण होती.तसेच अनेक भाषाही अवगत होत्या. मराठी कवितेवर आणि खास करून गझलेवर त्यांचे न फिटणारे ऋण आहे.मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती ही त्यांची त्यांच्या कवितेप्रमाणे अढळ ओळख राहणार आहे. अर्थात मातेचेच ऋण आपल्यावर आहे असे त्यांनी अनेक ठिकाणी स्पष्ट केले आहे.

गझलेच्या प्रेरणे बाबत त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे ,’ मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले ,भेटलेले, भोगलेले किंवा सोसलेले अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात तर कधी ते दिसत नाहीत. पण अवती भवती त्यांची कुजबूज चाललेली असते. कधी कधी चुकून एखादा चेहरा दिसतो ,कधीकधी स्पर्शही जाणवतो .एखाद्या वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवांचे बारकावे घेऊन येतो आणि मग शेराला, गझलेला सुरुवात होते.’

कविता आणि आयुष्य यांच्या परस्पर संबंधाबाबत सुरेश भट म्हणाले होते , ‘माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता .माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा आहे. जीवन तसे अपूर्णच असते. संपूर्णते साठी जखमा अपरिहार्य असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत ते जीवनही समृद्ध नाही .कवितेचा संबंध आयुष्याची असतोच.

” मला जाळून लोकांनी स्मशानी भाषणे केली ,

उशिरा मी म्हणे त्यांना कळया लागलो होतो …

अशी खंत या जखमांतूनच त्यांनी व्यक्त केली.अर्थात व्यक्तीपेक्षा समष्टीचा विचार भटांची कविता करते.सुरेश भटांच्या मातोश्री शांताबाई या डाव्या विचारसरणीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या .तर सुरेश भट स्वतः विद्यार्थीदशेत ‘ एस.एफ.आय. ‘या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते .सुरेश भटांची गीते शाहीर अमरशेख आपल्या कला पथकातून सादर करत असत. यावरून या द्रष्ट्या महाकवीचा वैचारिक पिंड आणि बांधिलकी अधोरेखित होते.

ज्येष्ठ समीक्षक कालवश द.भी.कुलकर्णी यांनी म्हटले होते की , ‘सुखवस्तू कुळात जन्माला आलेले सुरेश भट आयुष्यभर रमले ते अल्पशिक्षित ,गरीब ,श्रमिक वर्गात. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय समाज भेकड आणि भोंदू असतो आणि श्रमिक वर्ग शूर आणि अभ्रष्ट असतो अशी त्यांची धारणा होती. ” 

 फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे ?

 घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही.. 

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी 

जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी….

 इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

  मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..

 भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले

  एवढे मी भोगिले की मज हसावे लागले...

चुंबीलास तू माझा शब्द शब्द एकांती

 ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा ?

काय आगीत कधी आग जळाली होती ?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी..

 सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो 

 मी बाद होत गेले सारे मीच बाद नाही..

यासारखे दादांचे शेकडो शेर सर्वसामान्यांना तोंडपाठ आहेत.

“जमणारच नव्हते माझे या माझ्या चोर पिढीशी,

मी येणाऱ्या काळाची अनमोल आनामत होतो …

असेही त्यांनी म्हटले आहेच.असा हा अनमोल अनामत असलेला सर्वसामान्य माणसांचा महाकवी १४ मार्च २००३ रोजी नागपूर कालवश झाला.पण त्यांची कविता ,गीते ,गझला येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या ओठांवर असतील यात शंका नाही .सुरेश भट उर्फ दादा यांच्या १९व्या स्मृतिदिनी अर्थात 'मराठी गझल दिनी ' त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.


////////////// //////////////  ////////////// //   //////////////

Post a Comment

Previous Post Next Post