आहो साहेब, आमची तेवढी बातमी फोटो सहित लगेच ठळक मथळ्यात चांगली लावावी, पण उद्या आमची बातमी आलीच पाहिजे या करिता आग्रह धरतात. पण सध्या जाहीरात नको अडचण आहे तुम्हाला दिली की, मग सगळेच मागतात.
अडचणीच्या काळात दुर्दैवाने आपल्या हितचिंतकांना एक माणूस म्हणून पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसत नाही याचंच तर दुखं वाटते. काहो, तो पत्रकार माणूस नाही का ? त्याला स्वत:चा परिवार नाही का ? पत्रकार हा फक्त बातमी देण्यापुरताच असतो का, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जीवाच्या भीतीने घरातच बसला आहे. त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी,चालक, बँक कर्मचारी इत्यादी प्रमाणे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत;चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर आहेत. सर्व दैनदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवितात.
अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणारे पत्रकार बांधव, अन् त्यांचा परिवार कसा आहे काही अडचण तर नाही ना... असा क्षणिक दिलासादायक एकही शब्द अथवा फोन ऐकावयास मिळत नाही. त्यामुळे कधी-कधी हीच खंत मनाला वेदना देऊन जाते.
आपण केवळ समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच हेतूने पत्रकार हा इतरांना न्याय देण्यासाठी नाहक मोठ- मोठी माणसे अंगावर घेतो, सतत इतरांसाठी धडपडणारा हा घटक कधीही जात, धर्म पाहत नाही. आपलं घर वा-यावर सोडून प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखा अडचणीत सर्वांना मदत करतो. मात्र संकटात धावणारा आपला बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुरताच आहे काय ...? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.