पुणे : महाराष्ट्रातीलशालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला आहे. पाच वर्षे हा उपक्रम चालणार आहे.
या स्पर्धेची नावनोंदणी १ मे २०२१ महाराष्ट्र दिनापासून ऑनलाईन सुरू होत असून 'अंकनाद ' या अॅपद्वारे नावनोंदणी करता येईल.
मंदार नामजोशी म्हणाले,' पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे.
जिल्हा पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली राहील.
विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.
स्पर्धेचे नियोजन :
जिल्हा पातळी : विद्यार्थ्यानी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप ' www.mahaaanknaad.com ' वेबसाईटवर पाठवतील. जिल्हास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्याना त्या त्या गटातील इय त्तेचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.
राज्य पातळीवर : जिल्हानिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पाढ्यांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल
प्रवेश ,सहभाग आणि पारितोषिके
राज्य पातळी : प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ एक विजेते निवडण्यात येतील . सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच प्रथम तीन विद्यार्थ्याना अकरा हजार, सात हजार, पाच हजार बक्षीस व मानचिन्ह देण्यात येईल.
ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे.
बालगट (वयोगट - 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100 असा स्पर्धेचा विषय आहे . दुसरी, तिसरी साठी 1ते 10 पाढे, 11 ते 20 पाढे, 21 ते 30 पाढे असा स्पर्धेचा विषय आहे .चौथी, पाचवी साठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे .
सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे .
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे . खुला गट मध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे .
अधिक माहिती अंकनाद फेसबुक पेज वर मिळेल.
मागील वर्षी यशस्वी नियोजन :
मागील वर्षी २०२o मध्ये स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.१७६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. मंत्रालयात पारितोषिक वितरण झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते.