राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली. लॉकडाऊन लावण्यासंदर्भात राज्याच्या टास्क फोर्सने तयारी दर्शवली आहे. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र लॉकडाऊन लावण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व विभागांशी चर्चा करतील. अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा करतील. राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतील. त्यानंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेतील, असेही राजेश टोपे म्हणाले.गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करा
95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी. सोसायटय़ांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत. तरुण रुग्णांनादेखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे. त्याचे नियोजन करावे. मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेणे आदी सूचना टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सकडून करण्यात आल्या.