किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरून लोकांची पिळवणूक थांबवली पाहिजे, अन्यथा मनसेला याबाबतआंदोलन करावं लागेल.... रूपाली पाटील



कोल्हापूर :   
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळं 15 फेब्रुवारीपासून ज्यांच्याकडे फास्टॅग नाही अशा वाहनांना दुप्पट टोल भरावा लागत आहे. अशातच अनेक ठिकाणी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. फास्टॅग असूनही तांत्रिक अडचणींमुळं टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होते आहे. त्यातच दुप्पट टोल आकारणीमुळं आता टोल नाक्यावर गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे. मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी याबाबत जाब विचारला आहे.

रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं येत होत्या. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर रूपाली पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. जवळपास 7 किमी वाहनांच्या रांगा लागल्यामुळं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. टोल न घेता त्यांनी वाहनं सोडण्यास सांगितलं. फास्टॅग असूनही लोकांना रांगेत रहावं लागत असेल तर त्याचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी केला.रूपाली पाटील म्हणाल्या, किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरून लोकांची पिळवणूक थांबवली पाहिजे. फास्टॅग ही लोकांना सुविधा देण्यासाठी आहे की, लोकांना मारायला. जवळपास 7 किमी वाहनांच्या रांगा आहेत. त्यात रुग्णवाहिका अडकून लोकांचे जीव जातील. पहिल्यांदा टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा बंद करा. अन्यथा मनसेला याबाबत आंदोलन करावं लागेल अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



Post a Comment

Previous Post Next Post