गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान : डॉ.राजेंद्र पाटिल यड्रावकर.




प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा


*गडचिरोली,(जिमाका)दि.26* : गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अभिमानाचं स्थान आहे. येथील वनसंपत्ती, खनिजे, आदिवासी संस्कृती, त्यांच्या रिती व परंपरा विशेष आहेत असे उद्गार राज्याचे आरोग्य, वस्त्रोद्योग व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.डॉ. राजेंद्र पाटिल यड्रावकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनी गडचिरोली मध्ये काढले. आज मंगळवार, दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता  ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथील प्रांगणात राज्यमंत्री यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.  यावेळी डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज 71 वा वर्धापनदिना निमित्त सोहळयास उपस्थित असणारे स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, जिल्हयातील पदाधिकारी, शहीद जवानांच्या वीर पत्नी तसेच कुटुंबीय, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार बांधव, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवाची पर्वा केली नाही जिल्हयात नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले जवान यांना  याप्रसंगी  त्यांनी मन:पूर्वक श्रद्धांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, गडचिरोली नगराध्यक्षा योगिता पिपरे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील, इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहन कार्यक्रमावेळी परेड द्वारे भाऊसाहेब ढोले, पोलीस उपाधीक्षक यांनी सलामी दिली. 


पुढे बोलतांना श्री.यड्रावकर म्हणाले की, सद्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिती बदलली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करुन संसर्गाला रोखण्यासाठी योगदान देत आहेत. जनतेने केलेल्या सहकार्यामूळे कोरोनाला रोखण्यात मदत झाली. यापुढेही अशीच मदत सर्वांकडून अपेक्षित आहे. राज्यात सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण जिल्हयात असून सर्वांत कमी मृत्यूदरही आहे. सद्या 50 च्या आसपास सक्रीय रुग्ण आहेत. जिल्हयात नवीन आरटीपीसीआर प्रयोगशाळा, नवीन अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर खरेदी, नवीन रुग्णवाहिकेंचे खरेदी तसेच तालुक्यातील डॉक्टरांची भरती यामुळे निश्चितच फायदा होईल. जिल्ह्यातील अति दक्षता विभाग जणू मुंबईच्या लीलावती, टाटा, रुबी हॉस्पीटल सारखाच तयार करण्यात आला आहे. लवकरच येत्या वर्षभरात जिल्ह्यात मेडीकल कॉलेज सुरु होईल असे नियोजन आहे. गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून देशातील 115 जिल्ह्यात मोडतो. नुकतेच निती आयोगाने 115 आकांक्षित जिल्ह्यातील विविध कामकाजांचे मुल्यांकन करुन कामांच्या प्रगतीबाबत क्रम दिले. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा देशात 115 जिल्ह्यांमध्ये 3 रा रँक मिळाला त्याबाबत जिल्हावासियांचे कौतुक त्यांनी केले. 


या कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी, विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव केला. पोलीस शौर्यपदक मिळालेले पोउपनि,नागनाथ गुरुसिद्ध पाटील, पोना, महादेव मारोती मडावी, पोना कमलेश अशोक अर्का, पोशि, हेमंत कोरके मडावी, पोशि, अमुल श्रीराम जगताप, पोशि,वेल्ला कोरके आत्राम, पोशि,सुधाकर मलय्या मोगलीवार, पोशि, बियेश्र्वर विष्णु गेडाम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोना गिरीष मारोती ढेकले, पोना, निलेश मारोती ढूमणे यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती यांचे विशेष उल्लेखनीय सेवा पदक प्राप्त गुप्तवार्ता अधिकारी राजु इरपा उसेंडी यांना सन्मान मिळाला. तर प्रशासनात उत्कृष्ठ कामगिरी करीता जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी निवडणुक श्रीमती कल्पना निळ (ठुबे), जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी,  पीएम फेलो सुधकर गवंडगवे, पीएम फेलो उदित अग्रवाल, महसुल सहायक गणेश गेडाम, अव्वल कारकुन किशोर मडावी, वन परीक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा आर.एच.चौधरी, क्षेत्र सहायक कुनघाडा वन परिक्षेत्र एस.एम. मडावी व  दि. 31 डिसेंबर 2020 रोजी  कु. करिष्मा नरेंद्र मल (माहेश्वरी)हिने  महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चढुन सर केले. तसेच काही अधिकारी व कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे यांनी केले तर संचालन मदन टापरे, ओमप्रकाश संग्रामे व नितेश झाडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post