पण तज्ञ कोठे आहेत...



व्हेंटिलेटर आहेत पण तज्ञ कोठे आहेत.

महालिकेच्या रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटरची स्थिती

PRESS MEDIA LIVE N: पुणे : (मोहम्मद जावेद मौला )


पुणे - व्हेंटिलेटर आहेत परंतु ते हाताळणारी यंत्रणाच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये नाही. ते हाताळू शकणारे लोक नसल्याने हातात असलेली ही यंत्रणा वापरता येत नाही आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांची होणारी वणवण आणि मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती महापालिका प्रशासनाची झाली आहे.

रुग्ण अत्यवस्थ झाला, त्याला श्वास घेता येत नाही अशी स्थिती झाल्यावर त्याला व्हेंटिलेटरची आवश्‍यकता पडते त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आधी व्हेंटिलेटर बेड असलेली रुग्णालये धुंडाळतात.व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याचा प्रकारही या काही दिवसांत घडला आहे. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये ही सोय आहे तेथे अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यात येते आणि नाईलाजाने ते रुग्णांना भरावे लागते. महापालिकेची मोफत सोय असतानाही त्याचा वापर करता न येणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काम करणारे कर्मचारी हे पूर्णपणे प्रशिक्षितच लागतात. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर आणि नर्सेसचा स्टाफ असतो. त्यातून व्हेंटिलेटर हाताळण्याचे कौशल्य हे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यासाठी वेगळा स्टाफ नियुक्त केला जातो. महापालिकेने या स्टाफ भरतीसाठी गेल्या काही दिवसापासून अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

अतिदक्षता विभागात गेल्या सहा आठवड्यांत केवळ सहा तज्ज्ञांचीच नेमणूक महापालिका करू शकली आहे. अन्य स्टाफला अद्याप ट्रेनिंग देण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने या पदासाठी सुमारे दीड-पावणेदोन लाख रुपये वेतन देण्याचेही जाहीर केले आहे. असे असतानाही तेथे तज्ज्ञ मिळत नाही ही शोकांतिका आहे.

यातीलच उलटी परिस्थिती खासगी रुग्णालयांची आहे. तेथे डॉक्‍टर पासून ते नर्स आणि अन्य प्रशिक्षित स्टाफ आहे. त्यामुळे त्यांचा अतिदक्षता विभाग पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे. त्यामुळेच रुग्णांचा ओढा त्याकडे जास्त आहे. पैसे गेले तरी चालतील पण सुविधा आणि रुग्णांवर उपचार योग्य वेळेत झाले पाहिजे अशी अनेक नागरिकांची भावना झाली आहे.

महापालिकेकडे व्हेंटिलेटर आहेत परंतु ते ऑपरेट करण्यासाठी तज्ज्ञ नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आम्ही जाहिरातही दिली होती. गेल्या सहा आठवड्यापासून दर बुधवारी आणि गुरूवारी आपण डॉक्‍टरांच्या मुलाखती घेत आहोत. परंतु त्यामध्ये अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सहा आठवड्यांत केवळ सहाच जणांना नियुक्त करू शकलो आहोत. वास्तविक गरज यापेक्षा जास्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून थोड्याच दिवसांत 1,600 पदव्युत्तर डॉक्‍टरांची फळी उभी राहणार आहे; त्यातील काही डॉक्‍टर्स आपल्याकडे येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ती देखील वाट पाहवी लागणार आहे.


- विक्रम कुमार, आयुक्‍त, मनपा

Post a Comment

Previous Post Next Post