केजरीवालांच्या सीबीआय चौकशीविरोधात 'आप'चे मूक आंदोलन



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : ईडी-सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये अटक करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांना खोट्या आरोपंखाली ईडीकडून अटक केली गेली आहे. आता त्यापुढे जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय ने चौकशीसाठी बोलावले आहे. अशा पद्धतीने दडपशाही करून विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या विरोधात 'आप'ने गांधी पुतळा येथे मूक आंदोलन केले.

हवाला कायद्याचा गैरवापर करून 'आप'च्या मंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात काहीच पुरावे मिळत नसल्याने त्यांना जामीन मिळू नये म्हणून केंद्र सरकारला कोर्ट बदलण्याची मागणी करण्याची नामुष्की येत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने धाड टाकून देखील त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. राष्ट्रीय पातळीवर 'आप' उदयोन्मुख होत आहे, त्याचीच धास्ती केंद्र सरकारने घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला. 

यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंन्त माने, विजय हेगडे, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, समीर लतीफ, आदम शेख, उमेश वडर, पूजा आडदांडे, बबन भालेराव, उषा वडर, किशोर खाडे, शशांक लोखंडे, नाझील शेख, सदाशिव कोकितकर,  इलाही शेख, बसवराज हदीमनी, संजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post