मिलेट वॉक' आणि 'मिलेट बाईक रॅली'च्या माध्यमातून मिलेटबाबत व्यापक जनजागृती

दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्यांचा वापर वाढवण्याचा दिला संदेश


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : (जिमाका): आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिलेट वॉक आणि मिलेट बाईक रॅलीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मिलेट वॉक रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते तर मिलेट बाईक रॅलीचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीनंतर शाहू स्मारक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांना प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

 पारंपरिक हलगी वादन, जनजागृतीपर संदेश देणारे माहिती फलक, फेटे आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचा लोगो असणारी टोपी घातलेले विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कर्मचारी, नागरिक, लहान मुले यांचा उत्साह अवर्णनीय होता. रॅली दरम्यान मिलेट (पौष्टिक तृणधान्य)तसेच माहिती पुस्तिकेचे नागरिकांना वाटप करण्यात आले.

मिलेट बाईक रॅलीचा मार्ग- सायबर कॉलेजपासून आईचा पुतळा-राजारामपुरी मुख्य रस्ता-बागल चौक-पार्वती टॉकीज-शाहूपुरी मेन रोड-गोकुळ हॉटेल-व्हिनस कॉर्नर-फोर्ड कॉर्नर- आयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौकात मिलेट बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.

मिलेट वॉक रॅलीचा मार्ग- दसरा चौक पासून लक्ष्मीपुरी-बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे दसरा चौकात मिलेट वॉक रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीनंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. प्रवीण मतिवाडे म्हणाले, चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकवणे, त्यापासून विविध पदार्थ बनवणे व ते पदार्थ खाण्यासाठीची साखळी तयार व्हायला हवी. जेणेकरुन भारत देशाची भावी पिढी आणखी सदृढव सक्षम होईल. यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारी स्वीकारुन दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्यांचा वापर वाढवावा.

हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 म्हणून साजरे करण्यात येत आहे. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखे पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्ये डायरिया, बध्दकोष्टता, आतड्याच्या आजारास प्रतिबंधक करतात. तसेच मधूमेह, ह्दयविकार, ॲनेमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत. याचबरोबर पौष्टीक तृणधान्याचे पदार्थ कॅल्शिियमची कमतरता कमी करत असल्याने आहारामध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे, असे मत डॉ. देवेंद्र रासकर व डॉ. योगेश बन यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा विपणन अधिकारी चंद्रकांत खाडे, पणन विभागाचे सरव्यवस्थापक सुभाष घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी आभार मानले. 


Post a Comment

Previous Post Next Post