नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

पुण्यातील  भिडे वाडा  स्मारक  उभारणीच्या कामाला दोन महिन्यात सुरूवात-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा दि. 3 : महात्मा  ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच  देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे  येथील  भिडे वाडा येथे  स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छगन भुजबळ,महादेव जानकर, मकरंद पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नायगावच्या सरपंच साधना नेवसे आदी उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव तर कर्मभूमी पुणे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले , सावित्रीबाईंना घडविण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर जगाला आदर्शवत आहे. अनेक अडचणींना तोंड देत सावित्रीबाई फुले  यांनी महिलांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे राज्य आणि देशातील स्त्री शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. आज राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान आहेत.

सावित्रीबाई फुले यांची  प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करीत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. वसतीगृहांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

बचत गटांची निर्मिती

महिला सक्षमीकरणासाठी प्रशासन काम करीत असून, राज्यभरात 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करण्यात येणार आहे.  या बचत  गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कर्त्या पुरुषांचे निधन झाले.  त्यांच्या पाल्यांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना सुरु करण्यात आली आहे.  खंडाळा तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबर नायगांव ते मांढरदेव रस्ताही पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

     महात्मा फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटासंबंधी असलेल्या अडचणी दूर करून त्यांचे कार्य सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल .महाज्योतीला आवश्यक तो निधी देणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नायगाव ही पुण्यभूमी-शंभूराज देसाई...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही पुण्यभूमी आहे असे सांगून  पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  स्त्रियांमध्ये शिक्षण रुजवण्याचे काम फुले दांपत्यानी केले. त्याचबरोबर समाज सुधारणेचे महान कार्यही त्यांनी केले. नायगाव  या भागातील ज्यांची शेती डोंगरावर आहे त्यांच्यासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करुन जिल्हा विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह-सहकारमंत्री..

सहकार व इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री अतुल सावे म्हणाले, अनेक अडचणींवर मात करुन फुले दांपत्यानी स्त्री शिक्षणाचे कार्य केले. महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून इतर मागास विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहे. युपीएससी , एमपीएससी परीक्षाना मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांचीही संख्या 50 करण्यात आली आहे. नागपूर येथे पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील दहा तर शहरी भागातील दहा असे वीस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. इतर मागास विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वसतीगृह उभारण्यात येणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

   यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

    या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post