पिंपरी : स्वस्त धान्य दुकानदारांकडून दोन वेळा थम्ब घेऊन सुद्धा धान्य मिळत नाही



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी : शिधापत्रिकाधारकांना केंद्र व राज्य शासनाकडून एक वेळ मोफत तर एक वेळ नियमित दराने धान्य मिळत आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून दोन वेळा थम्ब (अंगठ्यांचे ठसे) देखील घेतले जात आहेत.मात्र धान्य दिले जात नाही. एकदा गहू तर दुसऱ्यांदा तांदूळ वाटपासाठी अंगठे घेतले असल्याचे सांगून काही स्वस्त धान्य दुकानदार दिशाभूल करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारक करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. स्वस्त धान्य दुकानदार अरेरावी करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. सध्या एक वेळ मोफत तर एक वेळ नियमित दराने धान्याचे वाटप होत आहे. त्यामध्ये पारदर्शीपणा यावा म्हणून शिधापत्रिकाधारकांचे अंगठ्याचे ठसे देखील घेतले जात आहेत. दोन वेळा अंगठ्यांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र त्यावर केवळ गहू, तांदुळ यासाठी दोन वेळा अंगठ्यांचे ठसे घेतले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. धान्य मिळत नसल्याची तक्रार करूनही संबंधितांवर कारवाई करू, असे केवळ आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे शिधापत्रिकाधारक सांगत आहेत.

अनेकदा अंगठ्याचे ठसे उमटले जात नाहीत. त्यामुळे पुन्हा ठसे घेतले असतील. मोफत व नियमित असे दोन प्रकारचे धान्य मिळत होते. मात्र ज्यांना मिळाले नाही, त्यांच्या रितसर लेखी तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई केली असती.

– दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय.

धान्य का दिले जात नाही, या बाबत स्वस्त धान्य दुकानदारांना जाब विचारला. त्यावर दुकानदाराने उलट उत्तरे दिली. त्यांची तक्रार परिमंडल अधिकाऱ्यांना केली. मात्र ते देखील दुर्लक्षच करत आहेत. धान्य न देणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
– साधना श्रीवास्तव, शिधापत्रिकाधारक.

हजारो कुटुंबीय अवलंबून

पिंपरी-चिंचवड शहरात तीन लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. त्यापैकी हजारो कुटुंबीय शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यावर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांची चूल याच धान्यामुळे पेटते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकारांकडे गांभिर्याने पहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post