आप'च्या जागर आंदोलनाला यश ; मागण्या मान्य

 


'

शंभर कोटी निधीच्या पाठपुराव्यासाठी हालचालींना वेग, महापालिकेने दिले लिखित आश्वासन

रस्ते बांधकाम देखरेखीत हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचे अभियंतांना पत्र 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : शहरात होणारे रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी महापालिकेने क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, वॉर्ड निहाय नागरिकांची रस्ते दक्षता समिती करावी, शंभर कोटींच्या रस्ते विकास निधीसाठी पाठपुरावा करावा आदी मागण्या घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून महापालिकेसमोर अनोख्या पद्धतीने 'जागर' आंदोलन सुरू होते.

आंदोलनातील मागण्यांवर महापालिका प्रशासन व 'आप' पदाधिकाऱ्यांची सुमारे चार तास बैठक चालली. या बैठकीत झालेल्या चर्चेत महापालिका प्रशासनाने सर्व मागण्यांवर लिखित आश्वासन देऊन त्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. 

रस्त्याच्या क्वालिटी कंट्रोलसाठी त्रयस्थ लेखापरीक्षण, पॅचवर्क, मॅनहॉल दुरुस्ती व देखभालीसाठी महापालिकेची यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी पवडी विभागातून इतर विभागात गेलेल्या कर्मचाऱ्यांची यादी संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर करणे, रस्ते बांधकाम सनियंत्रण साठी कनिष्ठ अभियंता व मुकादम यांच्यावर जबाबदारी, त्यामध्ये हलगर्जी केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिकेचा डांबर प्रकल्प दोन महिन्यात कार्यान्वित करणार, अनधिकृत स्पीडब्रेकर्सची यादी तयार करण्याच्या विभाग कार्यालयांना सूचना दिल्या गेल्या आहेत.  

शहरातील नवीन रस्ते, पॅचवर्क रस्ते, विशेष दुरुस्तीचे रस्ते यासाठी आधुनिक पद्धतीने सेक्शन व डिझाइन करण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षभर रस्ते देखभालीसाठी कंत्राटदार नेमून रस्त्यांची कामे करण्याचे निर्णय झाल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

शंभर कोटींच्या निधीबाबत पाठपुराव्याला वेग आणला असून स्वतंत्र सल्लागाराला सगळे अडथळे दूर करण्याचा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते करून झाल्यावर टाकली जाणारी बारीक डस्ट त्वरित उचलून घेण्याचे आदेश विभागीय कार्यालयांना देण्यात आले.

जागर आंदोलनाच्या माध्यमातून दर्जेदार रस्त्यांसाठी ज्या मागण्या आम्ही लावून धरल्या त्या मान्य झाल्या आहेत. रस्ते दक्षता समितीबाबत दहा दिवसांत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. त्यांचा निर्णय आल्यावर पुढील भूमिका जाहीर करू. महापालिकेने दिलेल्या आश्वासने अंमलात आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू. या जागरा शेवट महापलीकेतील 'टक्केवारी'चा बळी देऊन करू असा निर्धार 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी करत आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, अभिजीत कांबळे, अमरजा पाटील, डॉ. उषा पाटील, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, राकेश गायकवाड, डॉ. कुमाजी पाटील, विजय हेगडे भाग्यवंत डाफळे, शशांक लोखंडे, रविन्द्र राऊत, मयूर भोसले, रवींद्र ससे, आनंदराव चौगुले, सचिन वणीरे, अमरसिंह दळवी, रवींद्र पंदारे, लाला बिरजे, विजय भोसले, मुद्दसर दाढीवले, बाबुराव तोरसकर, मंगेश मोहिते, संजय नलावडे, प्रभाकर चौगुले, प्रकाश हरणे, शुभंकर व्हटकर, आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post