प्रेस मीडिया लाईव्ह :
सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो.राज्याच्या राजकीय पटलावर भाजप - शिंदे गट - मनसे यांच्या नेत्यांची जवळीक चर्चेत आली आहे. इतकंच नव्हे, तर या धर्तीवर आता राज्यात पुन्हा महायुतीची चर्चा रंगतेय.
तिथे महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा महायुती पाहायला मिळणार का, हा प्रश्न असतानाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'आमची सर्वांची मनं जुळली आहेत फक्त वरून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल' असं राजू पाटील म्हणाले आहेत.
मनसेच्या डोंबिवली शाखेला खासदार श्रीकांत शिंदे (यांनी दिलेली भेट. शिवाजी पार्कवर एकनाथ शिंदेआणि देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती पाहता त्याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये मनसे शिंदे गट भाजप महायुतीची शक्यता व्यक्त केली जातेय. भविष्यात काहीही होऊ शकतं हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्यही सूचक आहे.दरम्यान, 2023 च्या जानेवारी- फेब्रुवारी अखेरीस राज्यात महापालिका निवडणुका (BMC Elections) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरीस महायुतीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. असं झाल्यास पुन्हा एकदा राज्याचं राजकारण ढवळून निघेल, आरोपप्रत्यारोपांची सत्र सुरु होतील आणि रजाकीय महानाट्य रंगेल यात वाद नाही.