या पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेत आलेले शिंदे -भाजप सरकार आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यांच्यातील वादाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी निर्णय देताना राज्यातील सत्ता संघर्ष आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठा समोर होणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणाऱ्या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्याची शक्यता आहे. यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्याने हे प्रकरण पुढे ढकलले जात होते. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीने तातडीने मेन्शन करण्यात आले. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हते. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्याने सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून या पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.