आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी..ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे.आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला  प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे, असं प्रसिद्ध दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे. "ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करु शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी," असं मोहन दाते यांनी सांगितलं.

इतर दिवशीही गजबजलेली मुंबई आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोषणाईने आणखी उजळून निघाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतींच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा सुरु होतील. तर गौरी आणि सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांतील देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढेल.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांची रांग

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी रात्रभर पाहायला मिळाली. गणेश भक्त रात्रभर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. केवळ मुंबईतीलच नव्हे तर पुणे, कोल्हापूर आणि अगदी राजस्थान राज्यातूनही भाविक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. भाविकांच्या दोन वेगवेगळ्या रांगा आहेत. एक रांग मुख दर्शनासाठी तर दुसरी रांग चरणस्पर्शासाठी आहे.

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी


तर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पहाटे पावणे पाचच्या सुमारास काकड आरती पार पडली. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात भक्तिमय वातावरणात झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधामधून मुक्त झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post