नियमांचे पालन करणाऱ्या पतसंस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

 जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था  व सेवक सहकारी पतसंस्थांसाठी कार्यशाळा

प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा : पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा व सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थेचे फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व सेवक सहकारी पतसंस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांचे अनिल कवडे, कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले,  जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. बॅकांच्या ठेवीवर संरक्षण मिळते तसेच पतसंस्थांच्या ठेवीवर संरक्षण कसे मिळावे यासाठी सहकार विभागाकडून अभ्यास करण्यात आला आहे. बँका ज्या प्रमाणे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे त्या प्रमाणे पतसंस्थांनी काळा प्रमाणे बदले पाहिजे. संस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी आर्थिक शिस्तही पाळली पाहिजे.

ज्या उद्देशाने पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच उद्देशाने संस्था चालवावी. गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोना संकटामुळे अनेक संस्थांना अडचणी आल्या. संस्थांना आर्थिक शिस्त लागावी व संस्था वृद्धीगत व्हावी यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहे. सहकारी संस्थांनी दूरदृष्टी ठेवून लोकांच्या हितासाठी कामे करावे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

श्री. क्षीरसागर म्हणाले, आजची कार्यशाळा ही पतसंस्था संचालक मंडळ यांना दिशा देणारी ठरणार आहे. महाराष्ट्राचा विकासाचा पाया हा सहकार विभागावर आहे, प्रत्येक माणूस हा सहकारी विभागाशी जोडलेला आहे त्यामुळे सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण पारदर्शी झाले पाहिजे. नियामक मंडळाचे जे -जे परिपत्रक काढले आहेत त्याचा अभ्यास करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. सहकार विभागाने कायदे  आहेत त्याचे पालन करा.

आयुक्त श्री. कवडे म्हणाले, पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संस्था कशा पद्धतीने चालवावी यासाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार चळवळीला 100 वर्षाहून अधिकचा इतिहास आहे. सहकार विभाग शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेलाआहे. पतसंस्थेचा कारभार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही असे काम करावे. बँकेकडून कर्ज पुरवठा करत असताना त्याची पत तपासली जाते तसेच पतसंस्थेकडून पत तपासण्याचे मेंबरशिप मिळावी यासाठी आरबीआयकडे पत्र व्यवहार  सुरु आहे. पतसंस्थांचे पदाधिकारी जनहिताचे व देश हिताचे काम करीत आहे. या संस्थांमुळे जीवनात आनंदाबरोबर आर्थिकस्तर सुधारण्यात मदत होत आहे. जनमाणसात आपल्या संस्थेबाबत विश्वासाहर्ता वाढावी यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी एम.ए. मुरुडकर यांनी लिहिलेच्या सहकारी संस्थांच्या नियमांवरील पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक श्री. माळी यांनी केले. तर सर्वांचे आभार प्रदर्शन फेडरेशनचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास विविध पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post