प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे शहर हे ऐतिहसिक वारसा लाभलेला प्रख्यात असा शहर आहे.परंतु या शहरात पुरातत्व विभागाला ऐतिहासिक वास्तूंची निगाह राखण्यात अपयश किंवा हलगर्जीपणा असल्याचे दिसत आहे का ? कारण पुरातत्त्व विभागाच्या ताब्यातील आगाखान पॅलेस उद्यानाच्या पाण्याचा नळजोड महापालिकेकडून तोडण्यात आला. येथे पालिकेने तीन नळजोड दिलेले आहे. त्यांचे तब्बल 2 कोटींचे बिल थकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. दरम्यान, या कारवाईला आक्षेप घेत ही कारवाई चुकीची असून तातडीने हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी ही मागणी केली जात आहे.
आयुक्त म्हणाले, “आगाखान पॅलेसचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे. गेल्या चार महिन्यांपासून येथील बगीच्यासाठी होणारा पाणीपुरवठा खंडित केला गेला आहे.
या नळजोडांचे बिल पुरातत्त्व विभागाने देणे अपेक्षित होते. मात्र, वारंवार मागणी करूनही अद्याप ते देण्यात आलेले नाही. त्याच वेळी महापालिका उद्याने तसेच बांधकामांसाठी स्वच्छ केलेले सांडपाणी वापरत आहे. तेच पाणी स्मारकाच्या बागेसाठी वापरणे संयुक्तिक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारणांसाठी हा पुरवठा खंडीत केला आहे.असे सांगण्यात येत आहे.
पालिकेने तत्काळ नळजोड द्यावा..
आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू आहे,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेही स्मारक या ठिकाणी आहे. त्यामुळे पालिकेने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ऍड. सुनील करपे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. ही वास्तू पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ऍड. करपे यांनी केली आहे.