प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई मध्ये अंगडिया खंडणी प्रकरणात आरोपी असणारे आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र गृह विभागाने सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.
आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी फरार झाले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे केली आहे. सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात वसुलीवरुन आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी गृहविभागाला त्रिपाठी यांच्याविरोधातील पुरावेसुद्धा सादर केले आहेत. तक्रारदारांना फोन करुन त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी त्रिपाठी सांगायचे असाही आरोप करण्यात येत आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्ड्स मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयात दाखल केले आहे. याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, एफआयआरमध्ये त्यांचे नाव यापूर्वी नमूद केलेले नव्हते आणि पोलिस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची त्यांना माहिती नव्हती.
त्रिपाठी यांच्या याचिकेवर २३ मार्चला सुनावणी करण्यात येणार आहे. अटकेपासून संरक्षण देण्यात येणार की नाही? हे कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तसेच या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ३ पोलिसांना अटक करण्यात आले आहे. सीआयूने पीआय ओम वनगाटे, एपीआय नितिन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांना अटक केली आहे. १६ मार्च रोजी क्राइम ब्रांचने त्रिपाठी फरार असल्याचे सांगितले आहे.