जो पर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्यातील थकीत पगार संदर्भात कर्मचारी संघटना प्रतिनिधी व मुख्याधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे कर्मचार्यांनी पगार मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलग दुसर्या दिवशी नगरपरिषदेतील संपूर्ण कामकाज ठप्प राहिल्याचे दिसून आले.
इचलकरंजी नगरपरिषदेतील कर्मचार्यांचे ऑक्टोबर महिन्याचा पगार थकीत आहे. नोव्हेंबर अर्धा संपला तरी पगार न मिळाल्याने कर्मचार्यांनी काल सोमवार 15 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. त्यातच मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगलयांनी कर्मचारी संघटना प्रतिनिधींना भेटण्यास नकार दिल्याने संतापात भर पडली होती. अखेर मंगळवारी काही लोकप्रतिनिधींनी तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकरी व सर्व कामगार कृती समितीच्या प्रमुख प्रतिनिधींची चर्चा घडवून आणली.या बैठकीत पुन्हा निधी वळवण्याची चर्चा सुरू होताच मुख्याधिकारी ठेंगल यांनी त्याला स्पष्ट नकार देत सहाय्यक अनुदान आल्याशिवाय पगार दिला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कृती समितीच्या प्रतिनिधींनी बैठकीतून माघार घेत जो पर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहिल, असे घोषित केले. त्यामुळे नगरपरिषदेतील कामकाज मंगळवारीही ठप्पच राहिल्याचे दिसून आले.