प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील :
मुंबई महानगर प्रदेशातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील म्हाडाच्या हिश्शातील घरे कोकण मंडळाला देण्यास खासगी विकासक टाळाटाळ करत आहेत. काही विकासक ही घरे म्हाडाला देण्याऐवजी घरांची परस्पर विक्री करत असल्याचा आरोप आहे.यासंबंधीची तक्रार म्हाडाच्या कोकण विभागाकडे दाखल झाली असून, हा मोठा घोटाळा असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाण्यातील 'दर्शन सागर' नावाच्या विकासकाने आपल्या 'प्लॅटिनम हेरिटेज' प्रकल्पातील 31 घरे कोकण मंडळाला देण्याऐवजी परस्पर घरे विकत नियमांचा भंग केल्याची बाब समोर आली. यानंतर ठाणे महानगरपालिकेने विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दुजोरा दिला.
या प्रकारानंतर म्हाडाने ठाण्यातील अशा घरांचा शोध घेत 812 घरे ताब्यात घेत 14 ऑक्टोबरला सोडत काढली. कोकण मंडळाला वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतून मात्र अशी घरे मिळालेली नाहीत. अशात आता विरारमधील नितीन राऊत नावाच्या एका व्यक्तीने वसई-विरारमधील 20 टक्क्यातील घरे विकासक अधिकाऱ्यांच्या मदतीने लाटत असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.