कसलाही विलंब न करता तात्काळ आरोपींना फाशी द्यावी




केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे सरकारला निवेदन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  विशेष प्रतिनिधी

दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईतील साकिनाका परिसरात अमानवी स्वरूपात जो एका महिलेवर बलात्कार केला गेला हे मुंबई सारख्या उच्च शिक्षित व विकसित शहरात घडणं हे अतिशय लज्जास्पद आहे असे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे. दुर्दैवाने त्या महिलेचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

खरंच महिला या मुंबईत सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न एक मुंबईकर म्हणून सर्वांना नक्कीच पडला असणार.

सध्या सर्वच राजकीय पक्ष राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर उभे राहून आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण फक्त प्रतिक्रिया देऊन, एकमेकांवर ताशोरे ओढून अश्या गुन्ह्यांवर आळा घालता येऊ शकतो का ? या अगोदरही अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत पण त्या नंतर काय झालं? काही आंदोलन झाली... मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहल्या गेल्या... झालं ? विषय संपला ?

या मध्ये फक्त राजकारणी लोकांनी एकमेकांवर तसेच पोलिसांवर बोट दाखवत आपआपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. या मध्ये बळी कोण पडला ? सामान्य नागरिक.

पण आता बस्स... भरपूर झालं...

आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या नाहीत. तुमच्या राजकारणाला आम्हाला बळी पडायचं नाही. आम्हाला फक्त आशा आहे ती तात्काळ न्याय मिळण्याची. अश्या सैतानवृत्ती असलेल्या नराधमांना भर चौकात फाशी द्या. म्हणजे पुन्हा असे कृत्य करताना असे नराधम थरथर कापतील.

माझे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना हाथ जोडून निवेदन आहे  की कृपया आपण कसलाही विलंब न करता आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी असे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे. त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्रवासीयांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना, मुलींना तुम्ही उच्च शिक्षण तर देतच आहात पण सध्या समाजात ज्या गोष्टी घडतं आहेत त्या लक्षात घेता आपल्या मुलींना व मुलांना काही काळासाठी आपला मोबाईल बाजूला ठेवून स्व-संरक्षण कसे करता येईल त्यासाठी कराटे, लाठीकाठी, दांडपट्टा, ई. सारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण सुद्धा द्यावे की जेणेकरून अश्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल व आपली मुलं ही सुरक्षित राहतील असे संदिप कसालकर यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post