मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्त्यांची दुरवस्था ,. उद्धव ठाकरे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांसोबत उद्या सायंकाळी बैठक बोलवली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 राज्यभर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात गैरसोय तसेच त्रासाला सामोरे जावे लागत असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी चिंता व्यक्त केली.

राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावेत यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांसोबत उद्या सायंकाळी बैठक बोलवली आहे.

मुसळधार पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः कोकणाकडे जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीपर्यंतच्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पसरले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे-भिवंडी रस्त्याचीही पावसाने दुर्दशा झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती. अन्य सर्व कामे थांबवून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांसोबत राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत चर्चा केली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ही समस्या तातडीने दूर व्हावी यासाठी उद्या 'सह्याद्री' अतिथीगृह येथे संबंधित अधिकाऱयांची बैठक बोलावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post