मुंबई दि. 18 - पोलीस दल जगात श्रेष्ठ उत्कृष्ट पोलीस दल आहे.मात्र सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला कलंक लागला आहे.या प्रकरणी पोलीस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी सचीन वाझेंमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवण्यामागे षडयंत्र कुणाचे आहे. या प्रकरणी संशयास्पद भूमिका असणारे सचिन वाझे यांचा मनसुख हिरे हत्ये मागे हात असण्याची शक्यता असून सचिन वाझे मागे कोण आहे याबाबत चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रीय तपास संस्थेने चौकशी केली नसती तर सचिन वाझे सारखा अधिकारी पोलीस दलावर आणखी कलंक फासत राहिला असता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार ने तर सचिन वाझे यांना सुरुवातीला संरक्षण देण्याची चुकीची भूमिका घेतली होती असे ना रामदास आठवले म्हणाले.