रिजनरेशनची ताकद पृथ्वी आणि महिलांमध्ये':डॉ.वंदना शिवा

 

यनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' च्या  आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.

--------

'वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर' संकल्पनेवर चर्चा 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :' इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' आयोजित दोन दिवसीय  आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन  १ मार्च २०२४ रोजी पुण्यात झाले.'वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर' ही या परिषदेची संकल्पना असून 'युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' पुणेच्या गोखलेनगर येथील सभागृहात  परिषदेचे उदघाटन आज  सकाळी १० वाजता  मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव,ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक डॉ.वंदना शिवा,'इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' च्या अध्यक्ष डॉ.रंजना बॅनर्जी,उद्योजक मेहेर पदमजी  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

भारत,नेपाळ,भूतान,मालदीव,श्रीलंका,बांगलादेश,पाकिस्तान या देशातील   प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.'युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन-आशिया' च्या उपाध्यक्ष डॉ.मीरा बोन्द्रे, 'युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन,पुणे 'च्या अध्यक्ष डॉ.उज्वला शिंदे,सचिव कल्याणी बोन्द्रे,खजिनदार एड.प्रेमा कुलकर्णी, असोसिएट रीप्रेझेंटेटिव्ह नीलम जगदाळे, अबेदा इनामदार आदी उपस्थित होते.  कल्याणी बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.वंदना शिवा म्हणाल्या, 'पर्यावरण संवर्धनात महिलांनी योगदान देण्याची गरज आहे.रिजनरेशनची ताकद पृथ्वी आणि महिलांमध्ये आहे.अन्नाद्वारे आपण  पृथ्वीशी जोडले जातो. अन्नातून रासायनिक शेतीचे विष पोटात जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी एकत्रित येवून काम करण्याचा संदेश देणाऱ्या या परिषदेची गरज आहे. आपण भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो.

'पृथ्वीवर विविधता सर्वत्र आहे, ती जपली पाहिजे. अल्झायमर, ऑटीझम पासून विविध विकार हे पर्यावरण न जपल्याने होत आहेत. खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. प्रत्येक सूक्ष्म जीवाला बुद्धी असते. सूर्याकडून ऊर्जा मिळते. प्रकाश संश्लेषणाने वनस्पतीला  आणि त्यामुळे  आपल्याला ऊर्जा मिळते.म्हणून निसर्ग मृत होऊ देता कामा नये.पूर्वी जमीन खासगी नव्हती, सर्वांची होती.अहिंसक शेतीची गरज आहे. त्यात किडे, मुंग्यांना ,जीवजंतूंना स्थान असले पाहिजे. सेंद्रिय शेती ही अहिंसक शेती आहे.एकूण शेतीमध्ये सेंद्रीय  शेतीचे प्रमाण चांगले असेल तर निसर्ग शाबूत राहील. शेतकऱ्याविना शेती, शेतकऱ्याविना अन्न या चुकीच्या कल्पना आहेत.'एंट्रोपी' जपली तर प्रदूषण,क्लायमेट चेंजवर मात करता येईल'.

मेहेर पदमजी यांनी ' इंडस्ट्रियल सस्टेनेबिलिटी' विषयावर मते मांडली. त्या म्हणाल्या,'क्लीन एनर्जी, क्लीन एअर, क्लीन वॉटर साठी उद्योगांनी पुढे आले पाहिजे. चांगल्या भवितव्यासाठी ते उपयुक्त ठरेल.भारतात गवत, पिकांचा उरलेला भाग पेटवून देणे घातक आहे. त्यातून ऊर्जा, निर्मिती केली पाहिजे.इंधन उद्योगानी सांडपाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे.शाश्वततेसाठी कार्यरत नसलेल्या समाजात उद्योग जगू शकणार नाहीत'. अख्तर खातून यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. 

कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, ' असोसिएशनची सतत वाटचाल झाली, ही मोठी गोष्ट आहे. एसएनडीटी विद्यापीठाचा विचार केला तर महर्षी कर्वे यांच्यापासून शिक्षण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाची परंपरा आहे. महिला ही सक्षम असतेच, फक्त त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. महिलांनी भावनाना प्राधान्य देता देता कौशल्यांना प्राधान्य दिले पाहिजे.  महिलांसाठी गुंतवणूक केल्यानेच प्रगती झाली आहे.त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. महिलांना आदर देण्याची गरज आहे.सकारात्मक बदल घडविण्यासाठी महिला नेतृत्व सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे. हे महिलांचे युग आहे.ते प्रगतीपथावर नेले पाहिजे'. 

'डिफरंट अस्पेक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी 'या विषयावर दुपारी १२ वाजता झालेल्या चर्चासत्रात डॉ.वंदना शिवा,निमलका फर्नांडो,मेहेर पदमजी,अक्रम खातून सहभागी झाल्या.अडीच वाजता झालेल्या चर्चसत्रात 'सार्क' चे सदस्य असणाऱ्या देशातील प्रतिनिधी सहभागी झाले.सव्वा चार वाजता झालेल्या चर्चासत्रात 'सुशील भारद्वाज जीवनगौरव पुरस्काराचे वितरण केले गेले.तसेच गायत्री वत्सालय यांच्या 'डाएट सस्टेनेबिलिटी विथ मिलेट्स' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात  आले. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी 'आशियातील युनिव्हर्सिटी वूमन्स असोसिएशन ' या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात बांगलादेश,भारत,पाकिस्तान,जपान,थायलंड,हॉन्गकॉन्ग या देशातील प्रतिनिधी सहभागी होतील.अडीच वाजता 'सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट्स' विषयावर सादरीकरणे होतील.

...........................................

फोटो ओळ :

१. 'इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' आयोजित दोन दिवसीय  आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सत्रात बोलताना डॉ.वंदना शिवा,सोबत निमलका फर्नांडो,उद्योजक मेहेर पदमजी 

२.उपस्थित प्रतिनिधी 

३. 'इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' आयोजित दोन दिवसीय  आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सत्रात डावीकडून डॉ.उज्वला शिंदे,डॉ.वंदना शिवा,डॉ.रंजना बॅनर्जी,डॉ.उज्वला चक्रदेव,मीरा बोन्द्रे,मेहेर पदमजी,निमलका फर्नांडो 






Post a Comment

Previous Post Next Post