शब्दांच्या श्रीमंतीचा रखवाला झालो आहे ...ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २ " हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी ,स्नेह फुलांची बाग फुलावी नवीन वर्षी, अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला, पानोपानी गझल फुलावी नवीन वर्षी, अभंग - ओवी- दोहा-गवळण-श्लोक म्हणाले, आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी " हे  स्पष्ट करत आणि "जे हारलेत त्यांना मी चाल देत आहे, समजू नकात की मी माघार घेत आहे ,मी आज ज्ञानराया तुझियाच प्रेरणेने, या पालखीत गझला घालून नेत आहे " अशा शब्दातून येणाऱ्या काळात गझलेचा वावर चराचरात दिसून येईल असा आशावाद  तसेच " शब्दांच्या श्रीमंतीचा रखवाला झालो आहे, शब्दांना जपण्यासाठी मी शब्दच टाकत नाही " अशी भावना आपल्या गझलेतून ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ते  रेणुका गझल मंचच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन मुशाऱ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी रेणुका गझल मंचचे संस्थापक डॉ. रे. भा. भरस्वाडकर, प्रमुख पाहुण्या प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा , मुशायऱ्याचे समन्वयक आत्माराम कदम, संयोजक हर्षल आचरेकर , अनिकेत सागर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मुशायऱ्यात मुंबई ,ठाणे, नाशिक ,रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ,चंद्रपूर, जळगाव ,औरंगाबाद, परभणी आदी महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि मध्य प्रदेशातील पंचवीसहून अधिक गझलकारांनी आपल्या  गझला सादर केल्या. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी अनेक गझला सादर करत गझलेची वैशिष्ट्ये, तिचे वेगळेपण ,वर्तमान काळ आणि गझलकारांची जबाबदारी यावरही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भाष्य केले.तसेच गझलनंदा यांनी गझलेचे तंत्र, लय,यती यावर उस्फूर्त भाष्य केले.

या मुशायऱ्यात गझलनंदा यांनी ' धुंदल्या रात्री प्रितीचे गीत गावे ,चांदणे देहातुनी बहरून यावे,बोलका होऊन जातो शेर माझा,ही भटांची नाळ आहे ओळखावे,' अशी पेशकश करत सुरेश भटांशी नाते अधोरेखित केले. बापू दासरी (नांदेड) यांनी पुण्याईचा अंमल सरतो मनी वासना भरतांना,एक विखारी नजर पुरेशी पुण्य बाईचे पुसतांना असा मतला घेत गझल सादर केली.गोडवे शब्दात  त्यांचे आटले होते,ओढलेले पाय त्यांचे चाटले होते (प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद)

मदिरेमध्ये स्वतःला बुडवायचे किती,आयुष्य राहिलेले उधळायचे किती (हर्षल आचरेकर ),तुला भेटण्याआधी माझी ओळख नव्हती इतकी,चर्चेमध्ये  आलो  गझले  तुला  भेटल्यानंतर (अनिकेत सागर मालेगाव ),)मला वाटले सावज फसले तिला बिलगता,शिकार झाली माझी कळले ती हसल्यावर,(आत्माराम कदम, सातारा)जरा लावली आग घराला शेजा-याच्या,जळता जळता घर माझेही जळून गेले(नरहर कुलकर्णी, कोल्हापूर)आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्या सारखा मित्र पाहिजेकोठे चुकले सांगायाला तुझ्या सारखा मित्र पाहिजे (शोभा वागळे मुंबई) आदींनी मुशायऱ्यात रंग भरायला सुरुवात केली.

तसेच, माणूस आज चाले काट्यावरी घडीच्या ,झाले गुलाम सारे धाकात चाकरीच्या (डॉ. पाटोळे प्रशांत चिंचवड ),पोरीस पत्रिकेतुन नाकारता कशाला ?,सारे खरेच नसते नुसताच ठोकताळा( राजश्री सोले)कधीच मजला घाई नव्हती गझल कशीही लिहावयाची, शब्दच माझे हटून बसले कवितेमध्ये घुसण्यासाठी(सुरेश यशवंत कुलकर्णी कोडोली) डोळे दिपवी प्रगती इथली, नीती मात्र हरवली ,अधोगती ही बघून ईश्वर, अश्रू ढाळत आहे (मधुमती वऱ्हाडपांडे )कोंडलेला श्वास होता,स्पंदनेही थांबली, वेदनेला आसवेही, गाळताना पाहिले (सिंधू साळेकर,पुणे)दूर जाऊ नको सांगताना मला,वेदनांना तुझ्या ऐकले मी कुठे (सरिता गोखले,रत्नागिरी),तुझा आणि माझा निराळाच रस्ता,जरी भेटलो आज एके ठिकाणी(नीलिमा ताटके,ठाणे ),पंखास छाटण्याची आता गरज न उरली,अवसान त्राण सारे तोडून ठेवले मी( हेमंत कुलकर्णी, मुंबई)कसा विसरुनी गेला पुतण्या नात्यांच्या त्या धाकाला,वाऱ्यावरती दिले सोडुनी इथे लाडक्या काकाला (अरुण_सावंत,पंढरपूर )या जगी नाही कुणी रे एकटा,पोचवाया बघ तुला आले किती(सुरेंद्र टिपरे ) यांच्यासह 

मेहमूदा शेख ( श्रीक्षेत्र देहूगाव),कविता पुणतांबेकर ( मध्यप्रदेश) जयश्री कुलकर्णी ( नाशिक )प्रतिभा विभूते (पुणे), मकरंद घाणेकर ( पुणे ),विजय भगत ( चंद्रपूर)प्रा.विजय काकडे ,देव थोरात (सिन्नर) आशा साळुंखे ( जळगाव),सुरेश कुलकर्णी, उज्वला धांडे, पुष्पा पंढरीनाथ वाजे ,ज्योती वाघ बाविस्कर आदीसह काही गझलकारांनी आपल्या उत्तमोत्तम रचना सादर करून मुशायरा बहारदार केला.

Post a Comment

Previous Post Next Post