13 श्री सेवकांच्या मृत्यूला जबाबदार राज्य सरकार वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा .- रेखा ठाकुर

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे 

 राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार रेवदंडा येथील श्री समुदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भरवलेल्या कार्यक्रमास उपस्थित अनुयायां मधील 13 श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्या सर्व श्री सेवकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दुर्घटनेस जबाबदार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र भूषण सारखे शासकीय पुरस्कार हे शासकीय कार्यक्रमात शासकीय स्थळी आयोजित केले जातात. परंतु 16 एप्रिल 2023 रोजी  झालेल्या पुरस्कार सोहळ्यास एक शासकीय कार्यक्रम असे स्वरूप देण्या ऐवजी धार्मिक व राजकीय सोहळा असे  स्वरूप देण्यात आले होते.  महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा एका शासकीय स्थळी उदा. राज भवन, सह्याद्री अतिथिगृह अशा ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे मंत्री, शासकीय अधिकारी, श्री समुदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या काही श्री सेवकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याऐवजी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून खारघर  मध्ये  मोठ्या शो चे आयोजन करण्यात आले. 

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्माधिकारी यांचे अनुयायी मानतात. सन्मान सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा व राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा अट्टाहास एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्याला उपमुख्यमंत्री  व गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने  मूक संमती दिली. सांस्कृतिक खात्याने अशा भपकेबाज कार्यक्रमाला विरोध केला होता, असे वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाले आहे. असे असेल तर ती गंभीर बाब आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षे पोटी   पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात  सरकारी यंत्रणेचा गैर वापर केला गेला.  स्वतःच्या राजकीय उद्दीष्टांसाठी शासकीय  यंत्रणेला वेठीस धरण्यात आले व परिस्थिती हाताळण्यास  सक्षम नसलेल्या यंत्रणे वर नियोजन शून्य पध्दतीने भार टाकल्या मुळे प्रचंड कडाक्याच्या उन्हात तासंतास बसवून ठेवल्यामुळे लाखो श्री सेवकांचे अतोनात हाल झाले व 13 सेवकांचा हकनाक बळी गेला. आतापर्यंत या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 13 आहे व 18 व्यक्ती अत्यवस्थ आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बेजबाबदार व कल्पनाशून्य नियोजनात मुळे लाखो श्री सेवकांचे अतोनात हाल झाले व 13 निष्पाप जीव बळी गेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या हलगर्जी व बेजबाबदार भूमिके बद्दल  सरकारवर सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post