महापालिकेतील सफाई कामगारांचा रखडलेला वारसा हक्काचा प्रश्‍न अखेर संपुष्टात आला


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी/प्रतिनिधी -

महापालिकेतील सफाई कामगारांचा प्रदीर्घकाळापासून रखडलेला वारसा हक्काचा प्रश्‍न अखेर संपुष्टात आला आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणार्‍या सर्वच सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्या संदर्भातील अध्यादेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी रोजी जारी केला आहे. या निर्णयाचा संपूर्ण राज्यभरातील सफाई कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषद तथा आताच्या महापालिकेत कार्यरत  सफाई कर्मचार्‍यांना वारसा हक्काने नोकरीत स्थान मिळत नव्हते. या संदर्भात प्रदीर्घकाळापासून राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. वारसा हक्काने नोकरी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हा प्रश्‍न शासन दरबारी मांडून तो तातडीने मार्गी लावावा यासाठी सफाई कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने 5 फेब्रुवारी रोजी इचलकरंजीत भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्‍नी बैठक घेऊन विस्तृत माहिती जाणून घेतली घेत या प्रश्‍नी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार वारसा हक्क संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

लाड समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने घाणीशी संबंधित उदा. शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित मलनि:स्सारण व्यवस्था, नाली-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन घाणीशी संबंधित ठिकाणी साफसफाईचे काम करणार्‍या अनुसूचित जाती व नवबौध्द वर्ग, सफाई कामगारांया व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगार, पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावर मैला वाहून नेण्याचे काम केले आहे अशा सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य द्यावे असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाने वारसा हक्काने नोकरीत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने कामगार वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. त्याचबरोबर ज्या सफाई कामगारांच्या सेवा न्यायालयीन आदेशान्वये किंवा अन्य निर्णयान्वये नियमित झाल्या आहेत त्यांनाही या निर्णयाद्वारे लाड समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. अशा प्रवर्गातील एखाद्या कामगाराचे पदनाम काहीही असले तरी त्या कामगारास जर सफाई कामगार या व्याख्येत बसणारे काम दिले जात असेल तर त्यालाही सफाई कामगार म्हणून संबोधण्यात येणार असून सर्व लाभ दिले जाणार आहेत.

या निर्णयाबद्दल आमदार आवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या शिष्टमंडळात श्रीरंग खवरे, रवि जावळे, अशोक लाखे, राजू माळी व आदित्य नलवडे (नाशिक) यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post