२ सप्टेंबर चा सांगली येथील क्रांतीअग्रणी विचार जागर महोत्सव यशस्वी करूया : आमदार अरूणअण्णा लाड



प्रेस मीडिया लाईव्ह :

कुंडल ता. २८ क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांचे  जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड यांची जन्मशताब्दी साजरी करणे याचा अर्थ आपण भारतीयांनी जात --पात- धर्म- पंथ  निरपेक्ष एकसंघतेने  मिळवलेले स्वातंत्र्य आणि त्या नंतर आम्ही भारतीय लोकांनी तयार केलेले भारतीय संविधान आणि त्याची मूल्ये टिकविण्यासाठी कटिबद्ध राहणे हा आहे. त्यासाठीच शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली येथे क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी.बापू लाड जन्मशताब्दी महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू मा. तुषार गांधी आणि जेष्ठ पत्रकार व विचारवंत ज्ञानेश महाराव हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी या कार्यक्रमाला संविधानाप्रती बांधिलकीच्या भूमिकेतून सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.ते कुंडल येथे क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड  स्मारक येथे समविचारी पक्ष ,संघटना यांच्या व्यापक बैठकीत बोलत होते. यावेळी डॉ.बाबुराव गुरव ,किरण लाड,प्रसाद कुलकर्णी , व्ही.वाय. पाटील,ऍड. अजित सूर्यवंशी सतिश लोखंडे,  श्रीकांत लाड यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला कवठेमहंकाळ, पलूस, मिरज ,कडेगाव, खानापूर तासगाव इत्यादी तालुक्यातील  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post