अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

 अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन 

——–—--------------

भारतभूच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली

त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली..


प्रचंड मोठ्या साम्राज्याला देत हादरे होती जनता जनसामान्यांमुळेच इथली हुकूमशाही संपत आली..


जेव्हा इथल्या धर्मांधांनी परकीयांशी हात मिळवले

तेव्हा इथल्या लढवय्यांना हितशत्रूंची चाल कळाली..


सर्वस्वाचा होम करोनी उभी ठाकली लाखो जनता

मस्तवाल त्या साम्राज्याची अखेर तेव्हा झोप उडाली..


स्वातंत्र्याच्या पहाटवेळी हा नियतीशी करार केला

सत्ते मधूनी मिळत रहावी सामान्यांना ख्याल खुशाली..


समाजवादी समाजरचना या पायावर देश उभारू

या देशाची परंपरा अन घटनासुद्धा तेच म्हणाली..


ज्यांचे पूर्वज रक्त सांडते सारा भारत त्यांचा आहे

गद्दारांचे प्रेम बेगडी खेळत असते नवीन चाली..


या देशाच्या स्वातंत्र्याचे चंद्रसूर्यही लाखो होते

आज काजवे मिरवत असती खांद्यावरती उसन्या शाली..


करो कितीही प्रयत्न कोणी दमनाचा अन अमिषाचाही

अखेर जनता जिंकत असते स्वातंत्र्याचे युद्ध निकाली..


गंगाजमुनी परंपरांची ज्योत तेवती गौरवशाली

संविधानीक मूल्यांसोबत जनता आहे पुढे निघाली..


---प्रसाद माधव कुलकर्णी

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर

पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)


( ९८ ५०८ ३० २९०)

Prasad.kulkarni65@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post