कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये

 उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : जीलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि 30 जानेवारी 2022 पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पवार म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. 105 देश, भारतातील 23 राज्ये आणि राज्यातील 11 ठिकाणी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर 18 टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर 30 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये 'दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही' या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापनांच्या चालकांनी लशीच्या दोन मात्रांशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच कोविडपासून बचावासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड करण्यात यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड आकारण्यात यावा असे निर्देश अजितदादांनी दिले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन 95 प्रकारच्या मास्कचा वापर करावा, अन्य प्रकारचे मास्क सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्यांचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post