आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या न्याय हक्कासाठी सुरु असलेल्या राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानत आहे.याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी
एसटी कर्मचाऱ्यांनी शहापूर आगारासमोर दशक्रिया विधी करुन अनोखे आंदोलन केले.दरम्यान ,एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप कारंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला.
राज्य एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे शासनात विलिगीकरण करावे, चांगले वेतन द्यावे आणि सर्व शासकीय सोयी सुविधा मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत कामबंद
आंदोलन सुरू आहे.या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या ४२ आत्महत्या झाल्या तरी सरकारला जाग येत नाही.त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी शहापूर
आगारासमोर महाविकास आघाडी सरकारचा दहावा घालून दशक्रिया विधी केला.यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. दशक्रिया विधी करून थंड बसलेल्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मागण्यांचे फलक, काळे झेंडे हातात घेत या दशक्रिया विधीच्या माध्यमातून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.