दयामाया न दाखवता दंडात्मक कारवाई करावी
'आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत.निर्बंध शिथिल केले आहेत. तरूण वर्ग घराबाहेर पडला आहे. जणू काही कोरोना संपलाच असेच सगळे वागत आहेत. लोक मास्क घालत नसतील किंवा आरोग्यविषयक नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने अजिबात दयामाया न दाखवता दंडात्मक कारवाई करावी', असे निर्देशही ठाकरे यांनी दिले. 'कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत', अशी सूचना ठाकरे यांनी केली. 'कोरोना संपला असे सगळे वागत असून परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत', याची जाणीव ठाकरे यांनी करून दिली.
पुढे उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा आणि त्याची अंमलबजावणी करा.'
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा
'गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम (एसओपी) ठरविली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या आणि इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होताना दिसतात. उरगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत. मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही.स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे,' असे ठाकरे म्हणाले.
तर विवाह हॉल, सभागृहांचे परवाने रद्द
'ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क आणि इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई करावी,' असे ठाकरे यांनी सांगितले. 'लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको. हॉटेल्स, उरगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र, नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा,' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.