येरवडा - तुरुंगाला भेट देण्याअगोदर मला भीती वाटत होती. पण, कुतूहलसुद्धा होते.



 येरवडा - तुरुंगाला भेट देण्याअगोदर मला भीती वाटत होती. पण, कुतूहलसुद्धा होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या ठिकाणी कारावास भोगला होता. या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊन आनंद वाटला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या क्रांतिकारकांचे बलिदान किती मोठे याची जाणीव झाली, अशी प्रतिक्रिया गेनबा मोझे प्रशालेच्या प्रणव बोजरे आणि स्वप्नाली मोरे यांनी दिली.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात 'कारागृह पर्यटन' या संकलनेची सुरुवात झाली. या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दृक्‌श्राव्यप्रणालीद्वारे केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश यावेळी गेनबा प्रशालेच्या 10 विद्यार्थ्यांना प्रथम पर्यटनाची संधी मिळाली. यामध्ये प्रशालेतील स्वप्नाली माने, श्रद्धा सांगळे, सानिका लगड, आयुषी शेटके, दिशा देवकर, सुशिल गिरी, प्रणय बोरगे, अक्षय देशमुख, आदित्य शेलार, रितेश चव्हाण या विद्यार्थ्यांसह रघुनाथ रांधवन व नथू जगदाळे हे शिक्षक उपस्थित होते.

पाठ्यपुस्तकात अभ्यासात असलेला इतिहास आता विद्यार्थ्यांना व इतिहासप्रेमींना पाहण्यास मिळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व आहे. येरवडा कारागृह 150 वर्षांपूर्वीचे असून या कारागृहात स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते.

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा 'पुणे करार' येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्यसंग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. जनतेला हा इतिहास समजावा, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता 'कारागृह पर्यटन' ही वेगळी संकल्पना आहे. यातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांना आपल्या इतिहासातील क्षणांची माहिती मिळू शकेल.

यावेळी कारागृहाच्या माहितीबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड आदी ठिकाणांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेले वर्ग, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच विद्यार्थ्यांची ऑफलाइन वर्गात असणारी उपस्थिती याबाबत संवाद साधला. तुम्ही इयत्ता दहावीमध्ये शिकत आहात. अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा, असा सल्लाही पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार तृप्ती पाटील तसेच कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post