गझल साद चा बहारदार मुशायरा


गझलसाद चा बहारदार मुशायरा.



PRESS MEDIA LIVE :


कोल्हापूर ता. ३, कोरोनाच्या थैमानाने सरलेल्या वर्षात जे आघात केले त्या पार्श्वभूमीवर नवे वर्ष वेदनेवर फुंकर घालून मानवतेची प्रस्थापना करणारे ठरो असा आशावाद   नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने  गझलसाद,कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मुशायऱ्यात व्यक्त करण्यात आला.या मुशायऱ्यामध्ये वेगवेगळ्या रसांचा परिपोष करणाऱ्या गझला सादर करण्यात आल्या. प्रारंभी गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून गझलसाद समूहाची आजवरची वाटचाल आणि पुढील दिशा यासंबंधीचे विवेचन केले.या मुशायऱ्यामध्ये प्रा. डॉ.संजीवनी तोफखाने ,प्रा.डॉ. सुनंदा शेळके ,सारिका पाटील, राजश्री सूर्यवंशी ,हेमंत डांगे ,अशोक वाडकर, डॉ. दयानंद काळे, प्रवीण पुजारी,प्रथमेश गंगापुरे,प्रा. नरहर कुलकर्णी आणि प्रसाद कुलकर्णी यांनी गझला सादर केल्या.

     डॉ.संजीवनी तोफखाने यांनी 'ध्येयवेड्या माणसांची आज आहे वानवा ,ज्ञानवादी ज्ञातकांची आज आहे वानवा, मोगऱ्याची गुंफली मी छान वेणी देखणी, माळणाऱ्या कुंतलांची आज आहे वानवा ' असे म्हणत समाज व व्यक्ती यांचे वास्तव मांडून मूशायऱ्याची सुरुवात केली.प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी,' कधीतरी तू प्रियकर हो ना सहज म्हणाले, अवचित येऊन जवळी घे ना सहज म्हणाले ,कोजागरी  मी तुझ्या अंगणी सदैव सजवीन, चंद्र होऊनी उगवून ये ना सहज म्हणाले ' अशी हळुवार प्रेमभावना व्यक्त केली. राजश्री सूर्यवंशी यांनी ,' जीव वेडा वाट पाही त्या क्षणांची सारखी, अंगणी चाहूल आता माणसांची पारखी ' तर सारिका पाटील यांनी ' झुंज द्यायची आहे खडतर बाकी काही नाही, बनायचे मज आहे कणखर बाकी काही नाही ' अशा प्रभावी रचना सादर केल्या.

     प्रा.नरहर कुलकर्णी यांनी ' अंगणास या करू नये रे कधी रणांगण ,विसरून जावे माजघरातच आपले भांडण ' ही मानवी नात्यांच्या ओलाव्याची गरज सांगणारी गझल सादर केली.अशोक वाडकर यांनी ' किती कथा या शहराच्या ,किती व्यथा या शहराच्या ,इथे न उरल्या खुणा पुराण्या,नव्या विराण्या या शहराच्या ' असे शहरी वास्तव मांडले.प्रवीण पुजारी यांनी,' कोणाच्याही खांद्यावर मी ओझे ठेवत नाही, खरे सांगतो मिंध्यात मला राहणे जमत नाही ' अशी स्वाभिमानी गझल सादर केली.डॉ. दयानंद काळे यांनी ' घेऊन सोंग आता झोपायचे किती ?,समजून धर्म अफूला मी प्यायचे किती ? ' हा नेमका प्रश्न गझलेतून मांडला. प्रसाद कुलकर्णी यांनी ' हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी ,स्नेहफुलांची बाग फुलावी नवीन वर्षी ,अभंग - ओवी - दोहा - गवळण - श्लोक म्हणाले,व आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी ' अशी रचना सादर करत मानवता व गझल यांचे नाते नव्या वर्षात अधिक बळकट होवो असा आशावाद व्यक्त केला. यावेळी हेमंत डांगे यांनी मराठी व उर्दू गझल सादर केल्या. प्रथमेश गंगापुरे यांनीही रचना सादर केली. नागेशकर सभागृहात झालेल्या या मैफलीला सुभाष नागेशकर ,वरुणा कुलकर्णी, अभय वाडकर यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.


फोटो : गझलसाद ,कोल्हापूर समूहाच्या मूशायऱ्यातील गझलकारप्रा. डॉ.संजीवनी तोफखाने ,प्रा.डॉ. सुनंदा शेळके ,सारिका पाटील, राजश्री सूर्यवंशी ,हेमंत डांगे ,अशोक वाडकर, डॉ. दयानंद काळे, प्रवीण पुजारी,प्रा. नरहर कुलकर्णी आणि प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post