प्रत्येक समतावादी व्यक्तीने कृतिशील सहभाग घेतला पाहिजे व सहकार्य केले पाहिजे.



प्रत्येक समतावादी व्यक्तीने कृतिशील सहभाग घेतला पाहिजे व सहकार्य केले पाहिजे.   

समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी.

P RESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.८ समाज प्रबोधन ही प्रत्येक समाजाची सार्वकालिक गरज असते.ज्ञान ही आवश्यक गोष्ट आहेच पण समाजामध्ये ज्ञानापेक्षा शहाणपण  वाढण्याची गरज असते.त्याच मूल्यमापन गरजेचं असतं.म्हणूनच समाजात समतावादी सद्विचार रुजविणे व  त्यासाठीचे जनजागरण करणे फार महत्त्वाचं असते. स्वतःची आणि समाजाची ओळख व्यक्तीला पटणे गरजेचे असते. कारण त्यातूनच माणसाच्या आंतरिक प्रेरणेची जागृती होते. समाजात नवा प्रत्यय निर्माण होतो.प्रबोधन ही चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात घेऊनच समाजवादी प्रबोधिनी ही संस्था गेली त्रेचाळीस वर्ष सातत्यपूर्ण विविध उपक्रमांसह लोकप्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आजच्या सर्वांगीण प्रलोभनाच्या आणि विषमतावादी युगात वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याचे महत्व व गरज मोठी आहे.त्यात प्रत्येक समतावादी व्यक्तीने कृतिशील सहभाग घेतला पाहिजे व सहकार्य केले पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते राष्ट्र सेवा दलाच्या केंद्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित ' संघर्षात्मक रचना - संवाद ' या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.

प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मंडणीत समाजवादी प्रबोधिनीच्या गेल्या त्रेचाळीस वर्षांच्या सर्वांगीण वाटचालीचा आढावा घेतला.तसेच छत्तीस वर्षे सुरू असलेले अठ्ठावीस हजार पुस्तके व शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध 'अ ' वर्ग प्राप्त  ' प्रबोधन वाचनालय 'व गेली एकतीसवर्षे नियमित सुरू असलेले ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' हे मासिक  या उपक्रमांसह  सर्व सातत्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवशआचार्य शांतारामबापू गरुड,संस्थापक सदस्य शहीद गोविंद पानसरे , विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ. एन डी पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या  व कार्यकर्त्यांच्या योगदानाची कृतज्ञता पूर्वक नोंद घेतली.तसेच प्राचीन प्रबोधन प्रक्रियेसह युरोपात सुरू झालेल्या व भारतात विकसित झालेल्या आधुनिक प्रबोधन प्रक्रियेचा आढावा घेतला.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले की, कोणत्याही पुरोगामी परिवर्तनवादी संस्था संघटनेने ,चळवळीने आत्मस्तुतीत मग्न व्हावे असा हा काळ नाही. कारण दशकानुदशके आपण मांडत आलेल्या भूमिकेला तडा देणारा, विपरीतता आणणारा हा काळ आहे. ऐक्याचा इतिहास असताना ,समतावादी समाजरचनेची दिशा स्वीकारलेली असताना संस्कृतिक राष्ट्रवादाचे काल्पनिक भूत वाढत जाऊन धर्मांधतेचे गुंगी फोफावणे हे सुदृढ समाजव्यवस्थेचे लक्षण नाही. अशावेळी ज्ञानापेक्षा शहाणपणाला प्राधान्य देणाऱ्या समाजप्रबोधनाच्या कार्याची गरज फार मोठी आहे.त्यादृष्टीने सर्वांनी कार्यरत राहणे व आपले योगदान देणे गरजेचे आहे. समाजवादी प्रबोधिनी लोक प्रबोधनाचा हा जागर आजवर सातत्यपूर्ण करत आलेलीच आहे इथून पुढच्या काळात तो अधिक व्यापक पद्धतीने करेल.त्यामध्ये समविचारी मंडळींनी योगदान द्यावे हे सहकार्य करावे  ही या काळाची ही मागणी आहे. आपल्या सविस्तर भाषणामध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी लोकायत तत्वज्ञानापासून  गुरुगोविंदसिंग यांच्यापर्यंतच्या आणि ज्ञानेश्वरांपासून गाडगेबाबांपर्यंतच्या सर्व प्रबोधन प्रक्रियेचे सूत्रबद्ध विवेचन केले.आणि व्यवस्था बदलासाठी सर्व प्रबोधन,परिवर्तन ,पुरोगामी,विवेकवादी संस्था,संघटना,चळवळी यांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादित केली.


फोटो : "संघर्षात्मक रचना - संवाद ' या ऑनलाइन व्याख्यानात प्रबोधन चळवळ व समाजवादी प्रबोधिनी याविषयी बोलताना प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post