उरुळी देवाची आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका
खासदार वंदना चव्हाण यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
PRESS MEDIA LIVE : पुणे : (प्रतिनिधी) :
पुणे – देवाची उरुळी परिसरातील रहिवाशांनी आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आंदोलन केले आहे. त्यांच्या विरोधात महापालिका गुन्हे दाखल करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. महापालिकेचा नाकर्तेपण लपवून ठेवण्यासाठी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत. तसेच, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपाययोजना कराव्यात, असे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी पालिकेला दिले आहे.उरुळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये महापालिकेकडून मिश्र कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असून नागरिकांच्या आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. वारंवार हा प्रश्न उपस्थित होतो; परंतु पालिकेची याबाबतची भूमिका अक्षम्य आहे. याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.
अनेक सामाजिक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनातील प्रमुख अधिकारी कोणतीही ठोस कार्यवाही न करता मोघम उत्तरे देत आहे. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला 19 ऑगस्टला नोटीस पाठवली आहे. त्यात मिश्र कचरा बायोमायनिंग प्लॅंटमध्ये टाकू नका, लिचिटबाबत तातडीने उपाययोजना करा, असा आदेश आहे. महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचाही आदेशात समावेश आहे. अशा स्थितीत तेथील नागरिकांनी आंदोलन केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे.