महिलांवरील अत्याचार आणि महागाईचे उत्तर द्या ?

- महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना सवाल

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गेल्या दहावर्षात देशातील महिला, मुलींवर झालेले अत्याचार, महागाई, आणि मणिपूरातील हिंसाचार आणि अत्याचार, महिला कुस्तिपट्टूवर झालेला अत्याचार, उन्नाव आणि हाथरस  येथील अत्याचाराची घटना आदींसह महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही ? या  विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सभेत बोलावे, असे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.  यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणीही केली आहे.



पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी - इंडिया आघाडी महिला पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेस काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे,  रजनी त्रिभुवन, महापालिकेच्या‌ स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नीता रजपूत,  राष्ट्रवादी काँग्रेस‌ शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला शहरप्रमुख पल्लवी जावळे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे , निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी , राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

दिप्ती चवधरी म्हणाल्या, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुरू यांना भारताच्या‌ नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर का ठेवले, त्यांनी आदिवासी महिलेला का डावलले याचे उत्तर मोदी यांनी सभेत द्यावे.

कमल व्यवहारे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा  फुले आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या पुण्यात येत आहेत. त्यंनी महिलांच्या‌ ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही ? याचे उत्तर द्यावे. गेली दहा वर्षे लोकसभेत हे बील पडून आहे. जनगणना केल्याशिवाय आरक्षण देवू शकत नाही, हे माहिती असतानाही महिलांची मते मिळवण्यासाठी हे आरक्षण आणले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. आरक्षण आता लागू केले असते तर महाराष्ट्रातून १६ महिला लोकसभेत गेल्या असत्या. ‘बेटी पढावो ,बेटी बचाओ’ अशी केवळ घोषणा केली, अंमलबजावणी नाही.

पल्लवी जावळे म्हणाल्या, महिला कुस्तीपटूवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्या‌‌स टाळाटाळ केली. जेव्हापासून मोदी सरकार आले आहे, तेव्हापासून महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत. ब्रिजभूषणसिंग‌ यांच्या अत्याचाराबाबत भाजपच्या एकाही महिला नेत्याने तोंड उघडले नाही. ब्रिजभूषणसिंग‌ यांना भाजपने पाठीशी का घातले, याचे उत्तर मोदींनी पुण्याच्या सभेत द्यावे. भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांच्या सुरक्षेसंबंधी काय उल्लेख आहे, हेही सांगावे.

अश्विनी कदम म्हणाल्या, उन्नाव आणि हाथरस येथील पिडीतांवर अन्याय करणाऱ्यांना भाजप नेते पाठीशी घालतात. तक्रार करणाऱ्या पिडीतेला पोलिस हाकलून देतात. पिडीतेच्या‌ गाडीला ट्रक धडक देते, लैगिक अत्याचारानंतर पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिस‌ परस्पर अत्यसंस्कार करतात. पंतप्रधानांच्या‌ मुलीसोबत हे घडले असते तर त्यांनी काय‌ केलं असते ? याचे उत्तर द्यावे. तसेच पंतप्रधानांनी देशातील महिलांची माफी मागावी.

मृणाल वाणी म्हणाल्या, मणिपूरचा जो हिंसाचार झाला. तेथील अत्याचाराची माहिती तीन महिन्यानंतर पत्रकारांना कळते, मात्र पंतप्रधानांना माहिती होत नाही. मणिपूरच्या घटनांवर मोदी‌ काहीच बोलत नाहीत, हे दुदैवी आहे. पंतप्रधान संपूर्ण जग फिरतात. मात्र, त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळत नाही. याबाबत पंतप्रधानांनी सभेत बोलावे. देशातील महिला या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील, असेही‌ वाणी म्हणाल्या.

रजनी त्रिभुवन म्हणाल्या, कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र , हे पंतप्रधानांनी सभेत सांगावे. महागाई वाढली  आहे. महिलांना महागाईमुळे घर चालवणे अवघड आले आहे. काँग्रेसच्या राजवटीत आंदोलन करणारी स्मृती इराणी कुठे आहे, त्यांना आता महागाई दिसत नाही का ? मला‌ जर संधी मिळाली तर मी व्यासपीठावर जावून मोदींना महागाई बद्दल प्रश्न विचारेन.

निता रजपूत म्हणाल्या, पंतप्रधान येणार, जातीवर बोलणार, हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मंगळसूत्र हे एकमेकांना बांधण्याचे साधन आहे, हेच मंगळसूत्र ते वेगळे करण्याची भाषा करत आहेत. ज्यांनी  आपल्या पत्नीला वाऱ्यावर सोडले आणि आता ते मंगळसूत्रावर बोलत आहेत. अनेक महिलांनी आपली मंगळसूत्रे देशाच्या‌ स्वातंत्र्यासाठी दिली. मंगळसूत्राचे पावित्र्य पंतप्रधान मोदी यांना माहिती आहे का ? याचे उत्तर द्यावे. बायकोची‌ जबाबदारी घेत नाहीत, आणि ते आता परिवार या विषयावर बोलत आहेत. त्यांनी मंगळसूत्र, परिवार व गॅरंटी यावर बोलू नये.

 

अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रस्तावना केली.

 

-    अरविंद शिंदे

अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी


*फोटो ओळ* : मोहन जोशी, अश्विनी कदम, पल्लवी जावळे, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, दिप्ती चवधरी, गोपाळ  तिवारी, नीता राजपूत, मृणाल वाणी, रजनी त्रिभुवन

Post a Comment

Previous Post Next Post