बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन झालं आहे.बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती एनआयने दिली आहे. 79 वर्षांच्या बाली यांनी 'केदारनाथ', ' 3 इडियट्स' सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.मीडिया रिपोर्टसनुसार ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. Myasthenia Gravis या दुर्मिळ आजाराने त्यांना ग्रासलं होतं. या मुळे त्यांच्या प्रकृतीत सतत चढ-उतार सुरु होते.

अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच त्यांच्या चाहत्यांपासून बॉलिवूड कलाकारापर्यंत सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. चाहते सतत त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत.अरुण बाली यांचा जन्म 23 डिसेंबर 1942 मध्ये लाहोर, पाकिस्तान येथे झाला होता. बाली यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर त्यांनी तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आपला ठसा उमठवला आहे.

अरुण बाली यांनी '3 इडियट्स', 'पीके', 'रेडी', 'बर्फी', 'ओह माय गॉड', 'केदारनाथ', 'जमीन, 'सौगंध', 'जंटलमन', 'फूल और अंगारे', 'खलनायक' आणि 'पानिपत' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.   अरुण बाली यांनी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौगंध' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अरुण बाली यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. अरुण बाली यांनी 1989 मध्ये 'दूसरा केवल'मधून टीव्हीमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी आलेल्या 'फिर वही तलाश' या शोमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post