आर्यन खान आज सकाळी 11 वाजता आर्थर रोड जेलमधून सुटला

 

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन देण्यासोबतच 14 अटीही घातल्या आहेत


प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील : 

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) जामीन मिळाला. तर, आज तो सकाळी 11 वाजता आर्थर रोड जेलमधून सुटला आणि आपल्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर पोहोचला.मात्र, जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन देण्यासोबतच 14 अटीही घातल्या आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने आर्यनचा जामीन बॉण्ड भरला

बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने शुक्रवारी न्यायालयात पोहोचून आर्यनसाठी जामीनपत्र भरले. ती सत्र न्यायालयात आर्यनसाठी कोर्टरुममध्ये उभी राहिली आणि त्याचा जामीनदार बनण्याविषयी बोलली. यादरम्यान अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले की, पासपोर्टवर तिचे नाव नोंदवले आहे. त्यांचे आधार कार्डही लिंक करण्यात आले आहे. ती आर्यन खानची आश्वासन देत आहे. ती आर्यनच्या वडिलांची जुनी मैत्रीण आहे आणि आर्यनला त्याच्या जन्मापासून ओळखते. अशा परिस्थितीत न्यायमूर्तींनी अभिनेत्री जुहीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि आर्यनला जामीनपत्र जारी केले.

जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' 14 न्यायालयीन अटी

1. कोर्टाच्या म्हणण्यानुसार आर्यन खान आणि दोन सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 1 लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड जमा करावा लागेल. तसेच, किमान एक किंवा अधिक जामीनदार द्यावे लागतील.

2. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आरोपीला अशा कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्याच्या आधारावर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

3. प्रकरणातील इतर आरोपी किंवा व्यक्तीशी संपर्क किंवा बोलणार नाही.

4. आरोपीने असे कोणतेही कृत्य करु नये ज्यामुळे न्यायालयाच्या कारवाईवर किंवा आदेशांवर विपरित परिणाम होईल.

5. आरोपीने प्रत्यक्षपणे किंवा कोणत्याही प्रकारे साक्षीदार आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करु नये.

6. सर्व आरोपींना विशेष न्यायालयात त्यांचे पासपोर्ट जमा करावे लागतील.

7. या संदर्भात मीडिया किंवा सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य करु नये.

8. NDPS न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही.

9. आरोपींना मुंबईबाहेर जाण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागेल.

10. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल.

11. न्यायालयाने आदेशात असे म्हटले आहे की, आवश्यक कारण नसल्यास आरोपीला प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल.

12. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एकदा खटला सुरु झाला तर आरोपी कोणत्याही प्रकारे खटल्याला विलंब करणार नाही.

13. एनसीबी जेव्हा जेव्हा आरोपींना चौकशीसाठी बोलावेल तेव्हा त्यांना हजर राहावे लागेल. जर आरोपी कोणत्याही कारणाने तपासात सहभागी होऊ शकत नसेल तर त्यांना याबाबत तपास अधिकाऱ्यांना पूर्वीच माहिती द्यावी लागेल.

14. आरोपीने यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास एनसीबीला त्याचा जामीन रद्द करण्यासाठी थेट विशेष न्यायालयात अर्ज करण्याचा अधिकार असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post