25 वर्षे झाली तरीही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या संचात व दरामध्ये वाढ नाही.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमधील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2014-15 रोजी 3 हजार 395 वरून 2019-20 रोजी लाभार्थी विद्यार्थी संख्या 880 इतकी झाली आहे. 25 वर्षे झाली तरीही आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या संचात व दरामध्ये वाढ झालेली नाही.

शालेय शिक्षण विभागाअंतर्गत 1 लाख 6 हजार शाळांमध्ये 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 कोटी 25 लाख आहे. मात्र, शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2 लाखापेक्षा कमी आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षात फक्‍त 1,38,543 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्येत व रक्‍कमेत वाढच झालेली नाही.

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी 9 हजार 600 विद्यार्थी संच मंजूर असतानादेखील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2016-17 रोजी 9 हजार 486 वरून 2019-20 रोजी लाभार्थी विद्यार्थी संख्या 3069 इतकी झाली आहे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी संचालनालयाच्या स्तरावरून कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसारित केली जात नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे एकाड यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. ती त्यांना उपलब्धही करून देण्यात आली. शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही एकाड यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post