संधीची समानता हा आरक्षकणामागील हेतू.... तुकाराम अपराध यांचे मत


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी ता. ३१,आरक्षणाचे समर्थन करणारे किंवा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी केवळ आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण न करता आरक्षणा मागील घटनाकारांची भूमिका समजून घेतली पाहिजे.समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी वंचित आणि शोषित घटकांना संधीची समानता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.समताधिष्ठित समाज निर्माण करणे हा आरक्षणाच्या धोरणाचा मूळ उद्देश आहे.असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्ता व्याख्यानमालेत 'आरक्षण आणि  राजकारण ' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी  प्रा.रमेश लवटे होते.

तुकाराम अपराध पुढे म्हणाले,आरक्षण हा समतेचा राजमार्ग आहे.आरक्षण म्हणजे केवळ पोटापाण्याची सोय नव्हे. आरक्षणाच्या लाभार्थ्यांनीसुद्धा आपण समतेच्या यात्रेत सहभागी असल्याचे योग्य भान ठेवायला हवे. त्यासाठीची जबाबदारी उचलायला सर्वांनीच सज्ज राहायला हवे. प्रत्येकाने संविधानाच्या नैतिक अधिष्ठानावर ठाम उभा राहायला हवे.यावेळी अपराध  यांनी स्वातंत्रपूर्व कालखंडातील तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातील आरक्षणाचा इतिहास, इंद्रा साहनी प्रकरण, मंडल आयोग, १०२ वी घटना दुरुस्ती इत्यादी टप्प्यांचा आढावा घेतला.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात तुकाराम अपराध यांनी आरक्षणाबाबतच्या विविध तरतुदींचा धावता परिचय करून दिला.तसेच शंका व प्रश्न यांना समर्पक शब्दात उत्तरे दिली.

प्रा. रमेश लवटे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये आरक्षणाला विरोध करून आरक्षण रद्द करू पाहणारे समाजात पुन्हा विषमता निर्माण करण्याचा  डाव आखत आहेत., त्यांचा हा कुटील हेतू आरक्षणाची भूमिका समजावून घेऊनच हाणून पाडावा लागेल.यावेळी शशांक बावचकर यांची प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.यावेळी पांडुरंग पिसे,दयानंद लिपारे,अन्वर पटेल,सचिन पाटोळे,देवदत्त कुंभार,नौशाद शेडबाळे,शिवाजी साळुंखे,आप्पासाहेब  कालेकर,शकील मुल्ला,मनोहर जोशी,रामचंद्र ठिकणे, वसंतराव कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post