हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
सुमारे पंचवीस वर्षापासून रेणुका नगर च्या पाण्याच्या टाकी मधून पाणी साठा व वाटप होत नसल्याने ती टाकी विनावापर आहे . पाण्याची टाकी च्या आतील छत कोसळत असल्याने मोठा आवाज होत आहे.वेळी अवेळी येणाऱ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याटाकी जवळून रहदारी मार्ग आहेत तसेच शेजारील मैदानामध्ये मुले खेळतात व टाकीच्या सावलीमध्ये ग्रामस्थ विश्रांतीही घेतात. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेला टाकीच्या आतील छताचा भाग कोसळल्याने मोठा आवाज झाला.त्यावेळी भीतीने तिथून जाणाऱ्या ग्रामस्थांची पळापळ झाली. परिसरातील ग्रामस्थांनी आवाज कुठून आला हे लक्षात आले नाही परंतु टाकी जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी टाकीच्या आतील स्लॅब टाकीमध्येच पडल्याचे त्यांना सांगितले .
वारणा नदीतून स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना करताना रेणुकानगर येथील पाण्याची टाकी विनावापर व धोकादायक बनली असल्याची नोंद प्रस्तावात केली आहे. परंतु धोकादायक बनलेल्या टाकीची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायतीने पाऊल उचलले नाही. या टाकीजवळ असणाऱ्या ग्रामस्थांच्या वावरामुळे टाकीमुळे कोणताही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेऊन व टाकीची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे .
फोटो ओळी: यड्राव( ता.शिरोळ) येथील रेणुकानगर मधील विनावापर असलेल्या पाण्याची टाकी धोकादायक बनली आहे